---Advertisement---
जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनानंतर देशातील युवा मतदारांच्या राजकीय प्रभावाची चर्चा अधिक तीव्र झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने 2029 च्या लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित करत Gen Z मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष रणनीती आखण्यास सुरुवात केल्याची माहिती पक्षातील सूत्रांकडून मिळत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, तरुण मतदारांमध्ये प्रभावी नेतृत्व निर्माण करण्यासाठी पक्षात नव्या युवा चेहऱ्यांना संधी देण्याबाबत विचार सुरू आहे. विविध सामाजिक संघटनांमध्ये काम करणारे तरुण, तसेच पक्षाशी संबंधित युवा कार्यकर्त्यांना पुढे आणण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी लवकरच पक्षाची विशेष बैठकही होण्याची शक्यता आहे.
शहरी आणि ग्रामीण भागातील तरुणांशी थेट संवाद साधण्यासाठी राज्यभर युवक मेळावे आयोजित करण्याचाही पक्षांतर्गत विचार सुरू आहे. रोजगार, शिक्षण, कौशल्य विकास आणि इतर युवकांच्या प्रश्नांवर अधिक सक्रियपणे काम करण्याच्या सूचना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.
अलीकडेच जंतर-मंतर येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनात मोठ्या प्रमाणावर तरुणांचा सहभाग दिसून आला होता. या आंदोलनानंतर देशातील युवा मतदारांच्या राजकीय भूमिकेवर विविध पक्षांनी लक्ष केंद्रित केले आहे. 2029 पर्यंत देशात Gen Z मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असल्याने राजकीय पक्षांकडून आतापासूनच त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
दरम्यान, विद्यार्थी आंदोलनानंतर परीक्षा व्यवस्थेतील सुधारणा, शिक्षणाशी संबंधित धोरणे आणि तरुणांच्या प्रश्नांवर राष्ट्रीय स्तरावरही चर्चा वाढली आहे. अशा परिस्थितीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युवा मतदारांचा कल कोणत्या पक्षाकडे राहतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे









