डॉ. हेडगेवार यांच्या भाष्यातून संघकार्याचे मर्म !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला ९८ वर्षे पूर्ण होत आहेत. शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या संघाच्या वाटचालीचा प्रारंभबिंदू १९२५ हा असला, तरी तत्पूर्वीपासूनच संघनिर्माते डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या मनात अशा संघटनेचा विचार आकार घेत होता. पारतंत्र्यात असणाèया देशासमोर सर्वांत मोठे लक्ष्य हे स्वातंत्र्यप्राप्तीचेच असे. मात्र, ती ध्येयप्राप्ती करण्यासाठी पारतंत्र्याचा विळखा का पडला या कारणांचा शोध घेणे आवश्यक असल्याची डॉ. हेडगेवार यांची धारणा होती. एकीकडे काँग्रेसमधील मवाळ आणि जहाल गट होते; दुसरीकडे क्रांतिकारक होते. क्रांतिकार्यात स्वत: डॉ. हेडगेवार सहभागी होते. काँग्रेसमध्येही ते सक्रिय होते.लोकमान्यांचे ते भक्त होते. लोकमान्यांचा पगडा देशभरच्या तरुणांवर होता आणि डॉ. हेडगेवार त्यास अपवाद नव्हते. १९२० साली लोकमान्यांचे देहावसान झाले आणि काँग्रेसचे एकमुखी नेतृत्व महात्मा गांधी यांच्याकडे गेले.

लोकमान्य निवर्तल्यानंतर डॉ. हेडगेवार यांना निराळी संघटना काढावीशी वाटली हा योगायोग असावा की काँग्रेसच्या नव्या नेतृत्वाच्या धोरणांविषयी असणारा अपेक्षाभंग असावा, असाही प्रश्न उपस्थित झाल्याखेरीज राहत नाही.२८ मार्च १९३७ रोजी अकोला येथे एका बैठकीत केलेल्या भाषणात डॉ. हेडगेवार यांनी म्हटले होते… ‘१९१४… त्यावेळी इंग्लंड व जर्मनी यांच्यात तुमुल युद्ध सुरू होते. अशा वेळी देशात नवीन कार्य सुरू करण्यासारखी परिस्थिती नव्हती. सन १९१८ साली महात्मा गांधींचा काळ सुरू झाला. देशात त्यांचे राज्य सुरू झाले व १९२० साली त्याचे परिणामही दिसू लागले. अशा सर्व अडचणीत मला त्रास देत असलेले विचार सत्यकृतीत उतरवणे शक्य झाले नाही. हा दाखला महत्त्वाचा. गांधीजींकडे काँग्रेसची सूत्रे आल्यानंतर पाच वर्षांतच डॉ. हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली, हे नोंद घेण्यासारखे आहे. संघाच्या प्रारंभीच्या काळाचा मागोवा डॉ. हेडगेवार यांच्या भाषणांतून आणि त्यांनी केलेल्या पत्रव्यवहारातूनच घेणे त्यामुळे औचित्याचे ठरेल.

संघटनेची स्थापना झाल्यानंतर सहाएक महिन्यांनी संघाला नाव मिळाले. १९२५ सालच्या विजयादशमीच्या दिवशी या संघटनेची सुरुवात झाली आणि त्यापुढील वर्षाच्या वर्षप्रतिपदेच्या दिवशी या संघटनेचे नामकरण ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ असे करण्यात आले. डॉ. हेडगेवार यांनी म्हटले होते, सहा महिने संघकार्य केल्यानंतर आपण व्यवस्था कशी करू शकतो हे ओळखण्याकरिता व अनुभवण्याकरिता वर्षप्रतिपदेला रामटेकच्या यात्रेस जाण्याचे ठरले. तेव्हा साहजिकच लोकांनी असा प्रश्न विचारणे नैसर्गिक की हे लोक कोण? कुठले? म्हणून नाव ठेवण्यासाठी बरीच चर्चा केली. सर्व लोकांचा भर याचे नाव महाराष्ट्र स्वयंसेवक संघ ठेवावे यावर पडला. परंतु आपली संघटना ही संपूर्ण हिंदुस्थानव्यापी करावयाची होती म्हणून ते सार्थ वाटेना…’ डॉ. हेडगेवार यांचे द्रष्टेपण आणि संघटनेच्या कार्याच्या व्याप्तीबद्दलचे त्यांच्या मनातील स्पष्ट चित्र याची कल्पना यातून येऊ शकेल. स्वत: डॉ. हेडगेवार यांनी काँग्रेसमध्ये कार्य केले होते.तरीही त्यांना संघासारखी स्वतंत्र संघटना स्थापन करावीशी वाटली. याचे कारण स्वातंत्र्यप्राप्ती हे काँग्रेसचे चळवळीचे ध्येय होते; तर समाजातील संघटन नव्हे तर समाजाचे स्थायी संघटन हे डॉ. हेडगेवार यांचे ध्येय होते.

अर्थात या दोन्ही मार्गांचे महत्त्व होतेच आणि त्याची जाणीव डॉ. हेडगेवार यांना होती. त्यामुळे संघाची स्थापना केल्यानंतरदेखील ते काँग्रेसशी फटकून राहिले नाहीत. मध्यप्रदेशातील बिलासपूरचे संघचालक नूलकर वकील यांना लिहिलेल्या पत्रात (१८ सप्टेंबर १९३०) डॉ. हेडगेवार लिहितात: ‘प्रस्तुत चळवळीत (काँग्रेसचा सत्याग्रह) संघाच्या अस्तित्वाला कोणत्याही प्रकारचा धोका लागता कामा नये. याचा अर्थ असा कोणी काढू नये की, संघ या चळवळीच्या विरुद्ध आहे. परंतु संघकार्य हे राष्ट्रकार्य असल्यामुळे ते चालू ठेवणे हे प्रत्येक स्वयंसेवकाचे कर्तव्य आहे. या चळवळीत भाग घ्यावावयाचा आहे त्यांनी व्यक्तिश: चालकांच्या परवानगीने भाग घ्यावा.. परंतु संघाचे जे कोणी आधारस्तंभ असतील त्यांच्यावर मात्र संघ चालविण्याची जबाबदारी आहे. जागृती व्हावी म्हणून संघाचे या चळवळीशी सहकार्याचे धोरण आहे, विरोधाचे नाही. तरीपण संघाच्या अस्तित्वाला धोका पोहोचवून मदत करावी असे संघाचे मत नाही…’ १९३१ साली डॉ. हेडगेवर यांनी विदर्भातील मुलकर यांना संघाच्या कार्यपद्धतीविषयी पत्र लिहून मार्गदर्शन केले: ‘आपले संघाचे कार्य जसे जोराने चालले आहे तसेच जोराने चालू ठेवावे. दुसऱ्या कोणाचीही सूचना ऐकून कार्यपद्धतीत फरक करण्याचे कारण नाही.आत्मविश्वासाने, निश्चयाने, नेटाने व जगतात कोणालाही न भिता आपण आपले कार्य करीत राहावे म्हणजे परमेश्वर आपल्याला यश देईल याची खात्री बाळगावी…’

संघाचे कार्य गेले शतकभर सुरू आहे. त्या कार्याला आता धुमारे फुटले आहेत आणि तरीही या कार्याची यापुढेही आवश्यकता आहे. या संघटनेची ज्युबिली साजरी व्हावी अशी आपली अपेक्षा नाही, असे डॉ. हेडगेवार यांचे विधान उद्धृत करण्यात येते. मात्र, याचा अर्थ ते कार्य शक्य तितक्या वेगाने व्हावे असा त्यातील अर्थ अध्याहृत आहे.डॉ. हेडगेवार यांनी १९३८ साली नागपूर येथेच केलेल्या भाषणातून यावर भाष्य केल्याचे दिसेल. त्यावेळी संघाच्या स्थापनेला १३ वर्षे झाली होती. डॉ. हेडगेवार यांनी त्या भाषणात जे म्हटले होते ते आजही तितकेच लागू होईल: ‘आता आपल्या कार्याला १३ वर्षे पूर्ण झाली आहेत. या अवधीत आपल्या कार्याचा प्रसार बराच झाला. आपले म्हणणे लोक ऐकून घेत आहेत; मान्य करीत आहेत. ते आपल्या कार्याचे स्वागत करावयास तयार आहेत. गेल्या १३ वर्षांत आपण इतके कार्य केले.पण १३ वर्षे हा काही लहान अवधी नाही. ही काही क्षुल्लक गोष्ट नाही. या एका तपाच्या अवधीत अपेक्षेपेक्षा पुष्कळच अल्प कार्य झाले आहे, ही गोष्ट जर आपण नीट निरीक्षण करून पाहाल तर आपल्याला स्पष्ट दिसून येईल.

नुसती विचारप्रणाली लोकमान्य करण्यासाठी, तिला केवळ तात्त्विक मान्यता मिळवून देण्यासाठी जर आपल्याला १३ वर्षे लागली तर मग प्रत्यक्ष संघटन करण्यासाठी, प्रत्येक हिंदू अंत:करणात भावनेची ज्योत पेटवून कार्याची प्रचंड व अभेद्य भिंत उभी करण्यासाठी आपण किती वर्षे काम करणार आहोत? हे साधे त्रैराशिक सोडवा म्हणजे सध्या चालू आहे याच गतीने पुढेही काम चालू राहिल्यास ते पूर्ण यशस्वी होण्यासाठी किती दीर्घकाळ लागेल, याची स्पष्ट कल्पना तुम्हाला सहज येईल. आणि कार्याची गती वाढविण्याची जरूरी आपणास सहज समजेल.’ संघाच्या कार्याचे एका अर्थाने संघनिर्मात्याने केलेले हे आत्मपरीक्षण आणि प्रकट आत्मqचतन आहे. संघाच्या प्रारंभीच्या काळात संघ संस्थापकांच्या चिंतन-मननाचा प्रत्यय त्यातून अवश्य येईल. कामाचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करणे, निर्धारित लक्ष्याच्या फूटपट्टीवर कार्याचे मूल्यमापन करणे, जे झाले नाही ते मान्य करणे आणि त्यातून धडा आणि बोध घेऊन पुढील मार्गक्रमण करणे हे सगळे डॉ. हेडगेवार यांनी या भाष्यातून साधले आहे आणि नेतृत्व कसे असावे याचा वस्तुपाठही घालून दिला आहे. त्या पावलांवर संघाचे मार्गक्रमण सुरू राहिले म्हणून अनेक संकटांना तोंड देत देतही संघ वर्धिष्णू राहिला आणि आता तो शतकपूर्ती करणार आहे.

९८२२८२८८१९
– राहुल गोखल