अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जळगाव जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा; काय आहेत मागण्या ?

जळगाव : महागाई वाढत चालली आहे, त्यामुळे अर्थकारणाचा ताळमेळ बसण्यासाठी अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसांना मानधन वाढ देण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी संघटनेने आज बुधवारी जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढला. यामध्ये शेकडोच्या संख्येत सेविका आणि मदतनीस सहभागी झाल्या होत्या.

दरम्यान, विविध मागण्यांचे निवेदन जि.प. मुख्याधिकारी यांना देण्यात आले. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी संघटना, राष्ट्रवादी महिला आघाडी (शरदचंद्र पवार गट) प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये अंगणवाडी सेविका, मदतनीस सहभागी झाल्या होत्या.

निवेदनात म्हटले आहे की, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भरघोस मानधन वाढ मिळणे, त्यांना पेंशन योजना व ग्रॅज्युइटी, महागाई भत्ता, विमा संरक्षण लागू करणे, सेवा समाप्तीचा लाभ त्वरित मिळणे, मोबाईल रिचार्ज बिलात वाढ करणे, अंगणवाडी लाभार्थ्यांना देण्यात येणारा पोषण आहाराचा दर्जा सुधारून पोषण आहाराचे काम बचत गटांना देण्यात यावे,

अंगणवाडी सेविकांना स्वेच्छा बदली मिळणे, भरपगारी आजारी रजा मिळणे व थकीत बिले लवकर अदा करणे , १० वी पास मदतनीसांना सेविकापदी बढती मिळणे व त्यांची मागील सेवा सलग धरणे अशा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या  आहेत.