अजितदादांना ‘ते’ वक्तव्य अंगलट येणार? शरद पवार गट मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

मुंबई : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याच्या निर्णयावर अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते असताना आपली भूमिका मांडली होती. हे वक्तव्य आता अजित पवारांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. त्यांचं हे वक्तव्य शरद पवार गट आता निवडणूक आयोगाकडे देण्याच्या तयारीत आहे. “काही आमदार एका बाजूला गेले आणि त्यांनी म्हटलं पक्ष आमचा तर त्यांना पक्ष किंवा चिन्ह देणं योग्य आहे का?” असं अजित पवार म्हणाले होते.
राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हावर शरद पवार आणि अजित पवार गटाने दावा केला आहे. याबाबत येत्या सहा ऑक्टोबरला सुनावणी आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “जो व्हीडिओ सध्या चर्चेत आहे. त्या व्हीडिओमध्ये अजित पवार असं सांगत आहेत की मनसेचा एक सदस्य गेला तर मनसे पक्ष त्याच्यासोबत जाईल का? तर अजितदादांचं हे विधान योग्यच आहे. अजित पवार नेहमीच खरं आणि योग्य बोलतात. अजित पवारांची भूमिका देखील निवडणूक आयोगाने लक्षात घ्यावी.” असं जयंत पाटील म्हणालेत.
येत्या लोकसभा निवडणुकीत भाजप काही आमदारांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची चर्चा होतेय. यावर जयंत पाटील म्हणाले, “महाराष्ट्रात जे नेते नको वाटतात. त्यांना दिल्लीला पाठवण्याची प्रथा भाजपमध्ये आहे. त्यातलाच हा एक भाग आहे. त्याचमुळे या नेत्यांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची चर्चा होतेय.” असं जयंत पाटील म्हणालेत.
आमदार अपात्रतेबाबत लवकर निर्णय व्हायला हवा. आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लागतील. या सर्व आमदारांना पैलतीरी पोहोचवण्याचं काम राहुल नार्वेकर करत आहेत. हे ठरवून केलं जात आहे का? राहुल नार्वेकर योग्य तो निर्णय करतील. पण त्यांनी निर्णय लवकर घ्यावा हीच आमची अपेक्षा आहे. असंही जयंत पाटील म्हणालेत.