अजित पवारांचं अर्थ खात्याबाबत मोठं विधान; म्हणाले “अर्थखातं टिकेल की नाही…”

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत अर्थ खात्याबाबत मोठं विधान केलं. “आज माझ्याकडं अर्थखातं आहे. त्यामुळे आपल्याला झुकतं माप मिळतं. पण, यापुढं अर्थखातं टिकेल की नाही टिकेल, हे सांगता येत नाही,” असं विधान अजित पवार यांनी केलं. अजित पवारांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लढवले जात आहेत. महायुतीत अजित पवार नाराज असल्याचं बोललं जात आहे. अजित पवारांच्या कथित नाराजीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार यांचं विधान नैसर्गिक विधान आहे. ते राजकीय विधान नाही, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली. तसेच भविष्यात काय होईल, हे कुणालाच माहीत नसतं, असं सूचक विधानही बावनकुळेंनी केलं. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

अर्थ खात्याबाबत अजित पवारांनी केलेल्या विधानावर विचारलं असता बावनकुळे म्हणाले, “भविष्यात काय होईल, हे कुणालाच माहीत नसतं. उद्या काय होईल? किंवा तुमचा-माझा उद्याचा दिवस कसा असेल? हे कुणालाच माहीत नसतं. त्यामुळे अजित पवारांचं विधान हे नैसर्गिक विधान आहे. ते राजकीय विधान नाही.”