अरे बापरे! भरधाव ट्रकने 100 हून अधिक मेंढ्यांना चिरडले, महामार्ग ६ वरील घटना

नंदुरबार । नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील कोंडाईबारी घाटात भरधाव ट्रकने मेंढ्यांना चिरडले आहे. यात सुमारे 100 हून अधिक मेंढ्या ठार झाल्याची घटना समोर आलीय. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून या दुर्घटनेत मेंढपाळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

या घटनेबाबत असे की, मेंढीचे मालक लखा गोविंदा गोईकर बाळु सोमा गोईकर, दगडु गोईकर रा.विजापूर ता.साक्री जि.धुळे हे 700 मेंढ्याचा कळप घेऊन विसरवाडीच्या दिशेने गुजरात राज्यात जात होते. याच दरम्यान, धुळ्याहून सुरतच्या दिशेने जाणारा ट्रक (क्रमांक ए पी 31 पी जी 0869) ने कोंडाईबारी घाटात रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या जवळ जवळ 100हून अधिक मेंढ्यांना चिरडले.

या अपघातानंतर महामार्गावर तब्बल 100 ते 150 मीटरपर्यंत मेंढ्यांचे मृतदेह पडले होते.या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. अपघात माहिती पोलिसांना मिळताच पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाला आहे. या अपघताचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. सध्या पोलीस पुढील तपास करत आहे. मात्र या या अपघातामुळे मेंढ्या पाळणाऱ्यांचे मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. सध्या वाहतूक सुरळीत करण्याचे काम पोलीस प्रशासन करत आहे.

दरम्यान, ट्रक चालकाच्या निष्काळजी पणामुळे मेंढ्या चिरडल्या गेल्याचा आरोप करत मेंढपाळाने आरोपी ट्रक चालकावर कठोर कारवाई करत नुकसानाची भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.