आंदोलनातील गोळीबारानंतर जरांगे हिरो बनले; कुणी केलं वक्तव्य?

मुंबई : मराठा आंदोलनातील गोळीबारानंतर मनोज जरांगे पाटिल हिरो बनले. असं वक्तव्य विजय वड्डेट्टीवार यांनी केलं. तर, त्यांच्या या वक्तव्याला जरांगे पाटलांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे. स्वतःला हिरो समजत नाही. आमचं आंदोलन तुम्हाला संपवायचं होतं. असा पलटवार जरांगेंनी केला आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्यानंतर आता वड्डेट्टीवार यांनीही ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध केला आहे.
वड्डेट्टीवार म्हणाले, “जरांगे पाटलांच्या म्हणण्यावर सर्व काही ठरवू नये. अभ्यास करून तरुणांनी निर्णय घ्यावा. ज्या ठिकाणी नोकऱ्यांची आणि सोयी, सवलती यांचा संदर्भ येतो तिथे मोठं नुकसान होणार आहे. अशा परिस्थितीत मराठा तरूणांनी अभ्यास करून आपण कोणाला साथ देत आहोत. आपलं भलं काय आहे याचा विचार करावा. आंदोलनातील गोळीबारानंतर ते नायक म्हणून पुढे आले. समाजाचा पाठिंबा मिळाल्यामुळे ते आता सरकारला वाकवू शकतो, असं म्हणत आहेत. धमक्यांनी प्रश्न सुटणार आहे का? कायद्याच्या चौकटीत बसवून आरक्षण दयावं लागतं.” असं वड्डेट्टीवार म्हणाले.