आई-बाबा, मला माफ करा, माझं जाणं चांगलं होईल; विद्यार्थ्याने घेतला गळफास

राजस्थानच्या उदयपूरमधून पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. गळफास घेण्यापूर्वी मृत विद्यार्थ्याने आत्महत्येचे पत्रही लिहिले असून, त्यामध्ये त्याने आपल्या पालकांची माफी मागितली आहे. आई-वडिलांच्या अपेक्षेप्रमाणे तो जगू शकला नाही, त्यानंतर हे पाऊल उचलत असल्याचे मृताने लिहिले आहे.

ही घटना उदयपूरच्या बडगाव पोलीस स्टेशन परिसरात घडली. हर्षवर्धन सिंग असे मृताचे नाव आहे. १९ वर्षीय हर्षवर्धन हा येथील विद्या भवन पॉलिटेक्निक कॉलेजचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता, तो देवगड येथील राजसमंदचा रहिवासी आहे. मयत हर्षवर्धन हा या महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहत होता. मृताच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, तो हर्षवर्धनला त्याच्या खोलीत भेटण्यासाठी गेला होता. यावेळी खोलीचा दरवाजा बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

बराच वेळ दरवाजा ठोठावूनही हर्षवर्धन बाहेर न आल्याने त्यांनी हॉस्टेलच्या वॉर्डनला बोलावून घेतले. काही वेळातच इतर विद्यार्थ्यांचा जमाव तेथे जमा झाला. मात्र हर्षवर्धन यांनी दरवाजा न उघडल्याने तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी गेट तोडून आत जाण्याचा विचार केला आणि गेट उघडले असता त्यांना धक्काच बसला.

खोलीतील पंख्याला हर्षवर्धनचा मृतदेह लटकलेला असल्याचे लोकांनी पाहिले, त्यामुळे इतर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. वेळ वाया न घालवता कॉलेज प्रशासनाच्या लोकांनी पोलिसांना फोन करून माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह पंख्यावरुन खाली उतरवून पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोलीस तपासादरम्यान त्यांना मृत विद्यार्थ्याच्या खोलीतून एक सुसाईड नोटही सापडली आहे.