‘आता मी महत्त्व देत नाही, थोडे काही झाले की लगेच रडायला…’, गिरीश महाजनांचा कुणावर हल्लाबोल ?

जळगाव : संजय राऊत यांच्या जिभेला कुठलेही हाड नाही. कोणी स्वप्नातही विचार करू शकत नाही, असे संजय राऊत बोलतात. त्यांच्या बोलण्याला आता मी महत्त्व देत नाही. जनताही संजय राऊत यांच्या बोलण्याला महत्त्व देत नाही, अशी टीका ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केली.

भाजपचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या निवडणूक व्यवस्थापक तथा कोअर कमिटी सदस्यांची बैठक सोमवारी ६ रोजी जळगाव येथे पार पडली. त्यात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री महाजन बोलत होते.

मंत्री महाजन पुढे म्हणाले की, शरद पवारांची तब्येत खराब असते, त्यांच्या तब्येतीवर बोलणे उचित होणार नाही. मात्र रोहित पवार हे सध्या थोडे काही झाले की लगेच रडायला लागतात. रडून निवडणुका लढता किंवा जिंकता येत नाहीत. तुम्ही फार वेळ मतदारांना भावनिक करू शकत नाहीत. पवारांनी मुद्द्यावर आणि विकासावर बोलावे आणि त्यावर मत मागावी, अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी केली.

ना. महाजन यांनी शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरदेखील टीकास्त्र सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंचे आमदार-खासदार हे भाजपच्या जीवावर निवडून आले होते. आम्ही नसतो तर उद्धव ठाकरेंना १५ आमदार तरी निवडून आणता आले असते का? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.