आधीच अतिपावसाने पीक खराब, त्यातच बँकेची नोटीस; शेतकऱ्यानं उचललं टोकचं पाऊल

जळगाव : कर्जबाजारीला कंटाळून ३८ वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना हिरापूर शिवारात (ता.पारोळा ) घडली. महेंद्र विनायक सोनवणे (३८) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पारोळा तालुक्यातील हिरापूर येथे शेतकरी महेंद्र सोनवणे हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होते. शेतीकाम करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. महेंद्र यांच्याकडे दोन बिघे जमीन आहे, त्यात यंदा कापसाच्या पिकाची लागवड केली होती. मात्र, अतिपावसाने पीक खराब झाली आहेत.

त्यातच आठ दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांनी काढलेले बँकेचे पीककर्ज भरण्याची नोटीस आली होती, सततची नापिकी व येणाऱ्या उत्पन्नाचा सोर्स नसल्याने, हात उसनवार व सरकारी बँकांचे झालेले कर्ज कसे फेडावे, या चिंतेत महेंद्र असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

सकाळी घरी कोणाला काही न सांगता महेंद्र हे घरातून निघून गेले. मात्र दुपारपर्यंत घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला.

दरम्यान दुपारी दीडच्या सुमारास हिरापूर शिवारातील दत्तात्रेय पाटील यांच्या विहिरीजवळ त्यांच्या चपला आढळून आल्या. ग्रामस्थांनी विहिरीत उतरून त्यांचा मृतदेह बाहेर काढला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. पारोळा पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.  महेंद्र विनायक सोनवणे त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.