“आपलं आरक्षण ओबीसीकडे” आंतरवाली सराटीत नक्की काय म्हणाले मनोज जरांगे ?

मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज, रविवारी आंतरवाली सराटीमध्ये महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये त्यांनी सरकारला जास्तीचा वेळ देणार नसल्याची भूमिका व्यक्त केली आहे. शिवाय सापडलेल्या ५४ लाख नोंदींच्या आधारावर राज्यातील मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या, अशी मागणी केली.

बैठकीत काय म्हणाले जरांगे?
बैठकीत बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, आपलं आरक्षण ओबीसीकडे आहे, त्यांच्याकडून आपल्याला घ्यायचं आहे. त्यांचं आपल्याला एक इंचही नकोय. परंतु आपलं ते का खात आहेत? हा प्रश्न आहे.

”आता आपल्याला गुलालच घ्यायचा आहे, यात माघार नाही. धनगर आणि वंजारा समाजाला स्वतंत्र आरक्षण असल्याने यामध्ये त्यांचा काहीच प्रश्न नाहीये. मिळालेल्या कुणबी नोंदींच्या आधारावर अहवाल बनवून आरक्षण देण्याचा सरकारचा शब्द आहे. राज्याच्या सगळ्यात मोठ्या कायदेतज्ज्ञांनी आम्हाला लिहून दिलं आहे आणि सरकारने ते मान्य केलं आहे. त्यांच्याच शब्दावर सरकारने आरक्षण देण्याची गरज आहे.”

जरांगे पाटील पुढे म्हणाले की, जे कागदावर ठरलं आहे, त्या आधारावर मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्या. कारण हे शब्द तुमचे आणि तुमच्या तज्ज्ञांचे आहेत. सरकार आरक्षण देईल, यात मराठ्यांना शंका नाही. परंतु आपल्याला सावध रहायचं आहे, त्यामुळे आजची बैठक बोलावली आहे.

”या बैठकीच्या निमित्ताने सरकारला विनंती आहे की, २४ डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण द्यावं, जास्तीचा वेळ मिळणार नाही. आतापर्यंत मराठ्यांचा ५४ लाख नोंदी सापडलेल्या आहेत. त्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या, अनेकांचं प्रमाणपत्र थांबल्याची माहिती आहे. नोंदी सापडलेल्यांच्या घरी तलाठ्यांना पाठवून त्यांना प्रमाणपत्र द्या”, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.