आरएलच्या मालमत्तांवर ईडीची टाच ; तब्बल 315 कोटींची मालमत्ता केली जप्त

जळगाव \ मुंबई । ईडीने राजमल लखीचंद ज्वेलर्संच्या विविध मालमत्तांवर टाच आणली आहे. ईडीने विविध ठिकाणच्या 70 मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या सर्व मालमत्तेचे मूल्य रु. 315.60 कोटी एवढे आहे.

ईडीकडून जळगावातील राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ऑगस्ट महिन्यात छापेमारी करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान ईडीने तब्बल १ कोटी रुपयांची रोकड आणि ३९ किलोंची सोने आणि हिऱ्यांचे दागिने जप्त केले होते. या दागिन्यांची किंमत तब्बल २५ कोटी रुपयांच्या घरात आहे.

राजमल लखीचंद ज्वेलर्सचे मालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्यावरील ईडी कारवाईपाठी राजकीय दबाव असल्याची चर्चाही यावेळी झाली होती. आता ईडीने राजमल लखीचंद ज्वेलर्संच्या विविध मालमत्तांवर टाच आणली आहे. ईडीकडून त्यांच्या जंगम व स्थावर अशा ७० मालमत्तांची जप्ती करण्यात आली आहे. या सर्व मालमत्तेचे मूल्य रु. 315.60 कोटी एवढे आहे. दरम्यान, आर.एल गोल्ड प्रा. लि. आणि मेसर्स मनराज ज्वेलर्स प्रा. लिमिटेड यांच्यावर पीएमएलए २००२ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.