इर्शाळवाडी : ढिगाऱ्याखालून १०३ जणांना सुखरुप बाहेर काढलं, १२ जणांचा मृत्यू

रायगड : रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात बुधवारी रात्री दरड कोसळली. या गावातील २५ ते ३५ घरं माती आणि दगडांच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. गावातील १०० ते १५० लोक या ढिगाऱ्याखाली अडकल्याचा अंदाज सुरुवातीला बचाव पथक आणि पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यापैकी १०३ लोकांना मातीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आलं आहे तर या दुर्घटनेत आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला सल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

या घटनेला आता १७ तास उलटले आहेत. मध्यरात्रीपासून बचावकार्य सुरू आहे. खालापूर परिसरात अजूनही मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे बचाव पथकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. एनडीआरएफच्या बचाव पथकांसह पनवेल महापालिकेचं बचाव पथक, सिडकोचे मजूर स्थानिक ट्रेकर्सचे समूहदेखी इर्शाळवाडीत मदतकार्य करत आहेत. तसेच आज (२० जुलै) पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, दादा भुसे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आदिती तटकरे ही नेतेमंडळीदेखील इर्शाळवाडीत दाखल झाली आहे.

दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, बचाव पथकांनी आतापर्यंत १०३ लोकांना सुखरूप बाहेर काढलं आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींवर पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध सुरू आहे. तसेच या गावातील जे लोक कामानिमित्त बाहेर पडले होते, त्यांचाही शोध घेतला जात आहे. भातलावणीसारख्या कामानिमित्त बाहेर पडलेल्या लोकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच आश्रमशाळेत जी मुलं आहेत, त्यांचीही माहिती घेतली जात आहे.