उन्हामुळे जळगाव जिल्ह्यात विवाहितेचा मृत्यू; लग्नसोहळ्यावरुन परततांना बसला उष्माघाताचा फटका

जळगाव : गेल्या पाच ते सहा दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात सूर्य जणू आग ओकायला लागलाय की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याच्या नोंदीनुसार जळगावचा देशातील सर्वाधिक उष्ण शहरामध्ये नाव नोंदविण्यात आलं आहे. मे हीटमुळे जिल्ह्यात उष्माघाताचा त्रास होणार्‍या रुग्णांची संख्या वाढली आहे. दरम्यान मे हीटच्य्या तडाख्यात विवाहित महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी अमळनेर शहरातील तांबेपुरा भागात घडली. heatstroke-death असे मयत महिलेचे नाव आहे.

अमळनेर शहरातील तांबेपुरा भागातील रहिवाशी रुपाली राजपूत ह्या अमरावती येथे एका विवाह सोहळ्यानिमित्त गेल्या होत्या. सोहळा आटोपून त्या गुरुवार, ११ मे रोजी सायंकाळी रेल्वेने परत अमळनेर शहरात घरी परतल्या. घरी आल्यानंतर अचानक त्यांना मळमळ व उलट्यांचा त्रास सुरू झाला. यामुळे रूपाली यांना पतीने तांबेपुरा येथेच एका खाजगी डॉक्टराना दाखवले. उष्माघाताची लक्षणे असल्याचे सांगत डॉक्टरांनी गोळ्या औषध देऊन प्राथमिक उपचार केले.

थोडा वेळ रुपाली यांना बरेही वाटले मात्र सकाळी उठल्यानंतर त्यांना पुन्हा उलट्या मळमळ चक्कर सुरू झाल्याने घरच्यांनी सकाळी १०.३० वाजता तात्काळ रिक्षा करून रूपाली यांना शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले. या ठिकाणी पोहाचण्या आधीच रूपाली यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अमळनेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश ताडे यांनी महिलेचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट झाले होणार सदर मृत्यू उष्माघातानेच झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट आली असून सलग तीन दिवस जळगाव जिल्हा हा उष्णतेच्या बाबतीत देशात पहिला क्रमांक होता. शुक्रवारीही जळगाव येथे ४५.८ डिग्री सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली. वाढत्या तापमानामुळे घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, आवश्यकता नसल्यास बाहेर फिरणे टाळावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.