एकनाथराव खडसेंवरील कारवाईबाबत काय म्हणाले गुलाबराव पाटील, वाचा…

जळगाव : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या परिवाराच्या शेतामधून अवैध गौण खनिज उपसा झाल्याच्या तक्रारी नंतर तातडीने खनिज कर्म विभागाचे पथक काल जळगाव जिल्ह्यात मुक्ताई नगर येथे दाखल झाले आहे. राजकीय आकसापोटी ही कारवाई केली जात असल्याचा बाबत चर्चा होत असताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी मात्र या कारवाईचे समर्थन केले आहे. दरम्यान एकनाथ खडसे यांचं संदर्भातील हे प्रकरण विधान सभेत मांडले गेले होते. त्या ठिकाणी चौकशी करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे विधान सभेत दिलेले आश्वासन हे सर्वोच्च असल्याने त्यावर लवकर कारवाई होणे अपेक्षित असल्याचं ही गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.

जळगावमधील एका कार्यक्रमानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. संजय राऊत आमच्यामध्ये भांडण लावू पाहत असल्याचा गंभीर आरोप मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. मात्र त्यांच्यामुळे आमच्यात कोणताही फरक पडणार नाही. आगामी लोकसभा निवडणुका आम्ही बाळासाहेब ठाकरे गटाची शिवसेना आणि भाजपा यांच्या युतीत लढणार आहोत, असेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. युतीच्या आमच्या नेत्यांवर आमचा विश्वास आहे, ते जो निर्णय देतील, तो आम्हाला मान्य राहिल, मग तो निर्णय शून्य जागा लढविण्यासाठीचा असला तरी तो आपल्याला मान्य असेल, मात्र ते शिंदे साहेबांनी आम्हाला सांगायला हवे, अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

दरम्यान मंत्री मंडळ विस्तार बाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हेच सांगू शकतात. शिंदे गटात धुसपुस असल्याचं सांगितलं जातं आहे. या विषयावर बोलताना गुलाबराव पाटील यांनी म्हटल आहे, की मागच्या सरकारमध्ये ही धुसपूस होती आणि ती राहणारच आहे, धुसपूस झाल्यानेच तर आम्ही गुवाहाटीला गेलो होतो, असा मिश्किलपणे टोला ही त्यांनी यावेळी लगावला आहे.