एकाच कुटुंबातील ६ जणांवर गोळीबार; छठ पुजेवरून परतत होते, काय प्रकरण?

पाटणा : बिहारमध्ये नुकताच छठ पुजेचा सण उत्साहात पार पडला. मात्र, यादरम्यान तिथे एक धक्कादायक घटना घडली आहे. छठपूजेवरून परतणाऱ्या एकाच कुटुंबातील सहा जणांवर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून अन्य लोक गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार २० नोव्हेंबर रोजी ही घटना घडली असून आशिष चौधरी असे आरोपीचे नाव आहे. हे प्रकरण लखीसरामधील कबैया पोलीस स्टेशन परिसरातील आहे. येथील पंजाबी वस्तीत राहणारे शशिभूषण झा यांचे कुटुंब सोमवारी छठपूजेनंतर घरी परतत होते. त्यावेळी आशिष नावाच्या तरुणाने त्यांना रस्त्यात अडवत संपुर्ण कुटुंबियांवर गोळीबार केला.
यामध्ये शशिभूषण यांची दोन मुले चंदन आणि राजेंद्र हे जागीच ठार झाले आहेत. तर शशिभूषण यांच्यासह त्यांची पत्नी राजनंदन, मुलगी दुर्गा आणि सून लवली हे जखमी झाले आहेत. दरम्यान, जखमींना उपचारासाठी पाटणा येथे हलवण्यात आले आहे. तसेच आरोपी आशिष चौधरी फरार असून त्याचा शोध सुरु आहे.
आशिष चौधरी याचे अनेक दिवसांपासून दुर्गासोबत प्रेमसंबंध होते. परंतू, दुर्गाच्या कुटुंबीयांचा लग्न करण्यास नकार होता. त्यामुळे या हल्ल्यामागचे कारण हे प्रेमप्रकरण असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, अचानक झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आशिषवर गुन्हा दाखल केला असून त्याच्या कुटुंबीयांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे.