एरंडोल शहर २९ फेब्रुवारीला बंद; नागरिक कृती समितीने केले ‘हे’ आवाहन

एरंडोल : येथे राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरी करण्याच्या कामात विविध त्रुटी व असुविधा राहिल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर अंमळनेर नाक्या नजीक महामार्गावर व जवखेडा पिंपरी रस्त्याला बीएसएनएल ऑफिस जवळ अशा दोन ठिकाणी बोगदे व्हावेत. तसेच महाजन नगरपासून दत्त मंदिरापर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूला गटारी व इतर संसाधनांसह सात मीटर रुंदीचे समांतर रस्ते व्हावेत. या कामांसाठी रस्त्यालगतची अतिक्रमणे काढण्यात यावी, अशी मागणी येथील सर्वपक्षीय महामार्ग चौपदरीकरण समस्या निवारण नागरी कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष अमित पाटील, जि.प. माजी सदस्य नानाभाऊ महाजन, काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी विजय महाजन, भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, शिवसेना उ.भा.ठा गटाचे माजी समन्वयक रमेश महाजन, बाजार समितीचे माजी सभापती एस. आर. पाटील, डॉक्टर प्रवीण वाघ, माजी नगरसेवक जगदीश ठाकूर, भाजपा ओबीसी सेल अध्यक्ष अशोक चौधरी, भाजपाचे युवा कार्यकर्ते निलेश परदेशी, माजी उपनगराध्यक्ष अभिजीत पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष गोरख चौधरी, जिल्हा समन्वयक शिवसेना अतुल महाजन, एरंडोल तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बी एस चौधरी, शहराध्यक्ष कैलास महाजन, सचिव पंकज महाजन, गणेश महाजन, हिम्मत महाजन, सुहास महाजनसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
नागरिकांना आवाहन
अमळनेर नाक्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर २९ फेब्रुवारी २०२४  रोजी सकाळी ११  वाजेपासून मागण्या मान्य होईपर्यंत. एरंडोल शहर बंद पाळून शहरवासीयांनी महाठिय्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन राजकीय पक्षांचे नेते व नागरिक कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.