एसबीआय खातेधारकांसाठी मोठी बातमी; बँकेची झालीय २२ हजार कोटींनी फसवणूक

नागपूर : जर भारतीय स्टेट बँकेत अर्थात एसबीआयमध्ये अकाऊंट असेल तर तुमच्यासाठी ही मोठी बातमी आहे. देशातील सर्वात मोठ्या बँकांमध्ये गणना होत असलेल्या एसबीआयची तब्बल २२ हजार कोटी रुपयांनी फसवणूक झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकारात समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांमध्ये देशभरातील १२ हजार ६७१ प्रकरणांमध्ये २१ हजार ९१५ कोटी ५ लाख रुपयांनी फसवणूक झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक फसवणुकीची प्रकरणे ही २०२०-२१ या आर्थिक वर्षातील आहेत.

नागपुरातील सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारात ही माहिती समोर आणली आहे. कागदपत्रांमध्ये फेरफार करून घेतलेले कर्ज, सायबर फसवणूक, एटीएम अशा सगळ्याच पद्धतीच्या फसवणुकीचा यात समावेश आहे. बँकेमध्ये २०२०-२१ या आर्थिक वर्षात ५ हजार ७२४ प्रकरणांमध्ये १० हजार ८१ कोटी १४ लाख रुपयांची फसवणूक झाली. २०२१-२२ मध्ये ४ हजार १९२ प्रकरणांत ७ हजार ३६ कोटी ४० लाख रुपयांच्या फसवणुकीची प्रकरणे उघडकीस आली. २०२२-२३ मध्ये २ हजार ७५५ प्रकरणांमध्ये ४ हजार ७९७ कोटी ५१ लाख रुपयांची फसवणुकीची प्रकरणे उघडकीस आली.