औरंग्याच्या इतक्या औलादी अचानक महाराष्ट्रात कुठून पैदा झाल्या?

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये काल औरंगाजेबाच्या स्टेटसवरुन वाद निर्माण झाल्यानंतर दगडफेकीचा प्रकार घडला होता. या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटनांकडून कोल्हापूर बंद आणि ठिय्या आंदोलन करण्यात आलं. या घटनेवर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त करत अचानक औरंग्याच्या इतक्या औलादी या महाराष्ट्रात कुठून पैदा झाल्या? हे आपल्याला शोधावं लागेल, याच्यामागे कोण आहे, हे सुद्धा पाहावं लागेल, असा सवाल केला आहे.

जाणीवपूर्वक कायदा आणि सुव्यवस्था खराब झाली पाहिजे, यासाठी तर या औलादी पैदा झाल्या नाहीत ना, हे आपल्याला तपासावं लागेल. कोल्हापूरमध्ये आता परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. पूर्णपणे बंदोबस्त लावलेला आहे. माझी सर्वांना विनंती आहे, कोणीही कायदा आणि सुव्यवस्था खराब होणार नाही, याची काळजी घ्यावी, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

आम्ही कुठल्याही परिस्थितीत औरंग्याच्या औलादींना सोडणार नाही. कोणीही औरंगजेबाचे उदात्तीकरण करु शकणार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. हे नव्याने पैदा झाले आहेत, त्यांचे बोलविते धनी कोण आहेत, हे शोधल्याशिवाय आम्ही राहणार नाही. परंतु महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये कायदा हातात घेतल्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोच, पण औद्योगिक राज्य म्हणून जो नावलौकिक आहे, त्याला डाग लागतो. कोणी कायदा हातात घेतला, तर त्याच्यावर कारवाई करावीच लागेल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

महाराष्ट्रात औरंगजेबाचं उदात्तीकरण कोणी केलंच, तर साहजिक संताप होतोच, पण त्यासाठी कोणी कायदा हातात घेतला, तर त्याचं समर्थन होऊ शकत नाही. राज्यातील काही जिल्ह्यात अचानक औरंगजेबाच्या औलादी पैदा झाल्या आहेत. जे त्याचे फोटो, स्टेटस ठेवून दुर्भावना निर्माण होत आहे. या कारणाने तणाव निर्माण होत आहे. यामागे कोण आहे, हे शोधावं लागेल, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.