कंडारीत दोघा भावंडांची तर भुसावळातील कुविख्यात गुन्हेगाराची निर्घृण हत्या

भुसावळ : जुन्या वादातून दोघा सख्ख्या भावंडांसह कुविख्यात गुन्हेगाराची निर्घृण हत्या झाल्याची घटना भुसावळ तालुक्यात शुक्रवारी रात्रीनंतर उघडकीस आल्याने जिल्ह्यात खळबळ उउाली आहे. कंडारीतील घटनेत दोघा भावंडांचा मृत्यू झाला आहे तर भुसावळातील कुविख्यात गुन्हेगार निखील राजपूत याचीदेखील कौटुंबिक वादातून हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरात एकाचवेळी तिघांचा निर्घृण खून झाल्याचा प्रकार समोर आला असून या घटनेतील आरोपींना अटक करण्यात यंत्रणेला यश आले आहे.

कंडारातील भावंडांसह तिघांची हत्या
भुसावळ तालुक्यातील कंडारी गावातील शांताराम भोलानाथ साळुंखे (33) व राकेश भोलानाथ साळुंखे (28) या भावंडांची जुन्या वादातून चाकू, तलवार व लोखंडी रॉड डोक्यात मारून निर्घृण हत्या करण्यात आली. या हल्ल्यात विकी साळुंखे (30) व रमेश अमोल इंगळे (32, सर्व रा.कंडारी) हे जखमी झाले आहे तर या घटनेतील रमेश इंगळे यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांच्यावर ट्रामा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, दुसर्‍या घटनेत पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुविख्यात गुन्हेगार निखील राजपूतचा अनैतिक संबंधातून शालक निलेश ठाकूर यानेच चाकूचे सपासप वार करीत खून केला. ही घटना शनिवारी पहाटे दोन वाजता श्रीराम नगरातील पाण्याच्या टाकीवर घडली. या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.