कर्तव्यावर निघालल्या वरणगाव फॅक्टरी कर्मचार्‍याचा पुराच्या पाण्यात बुडाल्याने मृत्यू

भुसावळ : कर्तव्यावर निघालेल्या वरणगाव ऑर्डनन्सच्या कर्मचार्‍याचा पुरातील पाण्याचा अंदाज न आल्याने लवकी नाल्यात बुडून मृत्यू झाला. रविवारी सकाळी साडेसात वाजता ही घटना घडली. शुभम बबलू तायडे (23, आनंद नगर, भुसावळ) असे मयत कर्मचार्‍याचे नाव आहे. याप्रकरणी वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू
शुभम बबलू तायडे हा तरुण फॅक्टरीत दरबान पदावर कार्यरत होता. रविवारी सकाळी सात वाजता तो ड्युटीवर जाण्यासाठी भुसावळातून निघाला मात्र लवकीच्या नाल्याला पूर असल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने त्यात तो पडल्याचा पोलिसांचा कयास आहे. वरणगाव येथील मयूर जावळे यांना दूरध्वनीद्वारे इंटकचे महासचिव महेश पाटील यांना लवकी नाल्यात फॅक्टरीचे स्टिकर लावलेली मोटरसायकल पडलेली असल्याची माहिती दिल्यानंतर खातरजमा केली असता दुचाकी शुभम तायडेची असल्याचे त्यांच्या लक्षात आले तर नाल्याच्या किनार्‍यावर 100 मीटर अंतरावर शोध घेतल्यानंतर शुभम तायडे हा झुडूपांमध्ये मयत अवस्थेत आढळून आला.

महेश पाटील यांनी वरणगाव पोलिसांना माहिती कळवताच त्यांनी धाव घेत पाहणी केली. तपास वरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत.