कलम ३७०च्या निकालानंतर पंतप्रधानांनी केली नवी घोषणा; म्हणाले “हा निर्णय आशेचा किरण..”

नवी दिल्ली : कलम 370 बाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ऐतिहासिक असल्याचे सांगून त्यांनी जम्मू-काश्मीरच्या जनतेला चांगल्या भविष्याची ग्वाही दिली. हा निर्णय आशेचा किरण असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी ट्विटरवर ‘न्यू जम्मू आणि काश्मीर’ हॅशटॅग वापरले आहे.

मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “कलम 370 रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निर्णय ऐतिहासिक आहे. हे 5 ऑगस्ट 2019 रोजी भारतीय संसदेने घेतलेल्या निर्णयाला घटनात्मकदृष्ट्या समर्थन देते. जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील आपल्या बांधवांकरिता ही आशा, प्रगती आणि एकतेची घोषणा आहे. न्यायालयाने, आपल्या प्रगल्भ ज्ञानाने एकात्मतेचे मूलतत्त्व बळकट केले आहे. भारतीय या नात्याने आम्ही सर्वोच्च न्यायालयाला कायम सर्वोच्च स्थानी मानतो.”

आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधानांनी ‘न्यू जम्मू आणि काश्मीर’ हॅशटॅगसह लिहिले, “आजचा निर्णय हा केवळ कायदेशीर निर्णय नाही, हा एक आशेचा किरण आहे, उज्ज्वल भविष्याचे वचन आहे आणि एक मजबूत, अखंड भारत निर्माण करण्याच्या आमच्या सामूहिक संकल्पाचा दाखला आहे.” असं त्यांनी म्हटलं आहे.