काँग्रेस म्हणजे गंजलेले लोखंड; पंतप्रधान मोदींची टीका

भोपाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज मध्य प्रदेश दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भोपाळमधील सभेत लोकांना संबोधित करताना काँग्रेसला गंजलेले लोखंड म्हटले. तसेच, काँग्रेस पक्षाकडे भविष्याचा विचार नाही. विकासाच्या प्रत्येक प्रकल्पावर काँग्रेस टीका करते. भारताचे यश काँग्रेसला आवडत नाही. काँग्रेसला देशाला पुन्हा विसाव्या शतकात घेऊन जायचे आहे, अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली.

पीएम मोदी पुढे म्हणाले की, काँग्रेसने लोकशाहीला कुटुंबव्यवस्था म्हटले. काँग्रेसचे राजकारण गरिबी आणि वंचितांवर फोफावते. ज्यांच्याकडून त्यांना मते मिळाली, त्यांनाच लाभ द्यायचा. आज जग भारताविषयी जे काही बोलले जाते, ते याआधीही बोलले गेले असते, पण काँग्रेस केवळ एका कुटुंबाचे गुणगान करण्यात व्यस्त राहिली. काँग्रेसने भारतातील भ्रष्ट व्यवस्थेचे पोषण केले. काँग्रेसने देशाला अन्न, वस्त्र, निवारा यात अडकवून ठेवले. तुम्हाला आणि तुमच्या मुलांना या अडचणीचा सामना करावा लागू नये, यासाठी भाजप सरकार सतत काम करत असल्याचे मोदी म्हणाले.

काँग्रेस अजूनही त्याच मानसिकतेत आहे. चांदीचा चमचा घेऊन जन्मलेल्या त्यांच्या नेत्यांना गरिबांचे काही देणं-घेणं नाही. काँग्रेस नेत्यांसाठी गरिबांचे जीवन पर्यटन आहे. त्यांच्यासाठी ही झोपडपट्टी पिकनिक आणि व्हिडिओ शूटिंगचे ठिकाण बनले आहे. गरीब शेतकऱ्याचे शेत काँग्रेससाठी फोटो सेशनचे मैदान बनले आहे. यापूर्वीही त्यांनी असेच केले होते, आजही ते तेच करत आहेत.

महिला आरक्षण विधेयकावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसचे गर्विष्ठ मित्र हा कायदा रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांची विचारसरणी आजही बदललेली नाही, हे लोक खूप अस्वस्थ आहेत. काँग्रेसचे लोक फक्त नकारात्मकता पसरवतात. काँग्रेसला ना स्वतःला बदलायचे आहे ना देश बदलू द्यायचा आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.