केव्हा पडणार पाऊस? हवामान विभागाने दिली महत्वाची अपडेट

पुणे : भारतीय हवामान विभागाकडून महत्वाची अपडेट समोर आली आहे. पुणे, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, अहमदनगर, बीड, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अकरा जिल्ह्यांमध्ये 30 ऑगस्ट रोजी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

राज्यात अनुकूल स्थिती नसल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पावसाची उघडीप होती. पुढील आठवड्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. सप्टेंबरमध्ये पावसाचा जोर काहीसा वाढण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे.

पुणे आणि महाराष्ट्रातील इतर अनेक जिल्ह्यांमध्ये ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे आणि येत्या काही दिवसांत राज्यात भरपूर पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. राज्यात पुढील 24 तासांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

IMD पुण्याचं हवामान आणि अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी म्हणाले की, येत्या पाच दिवसांत राज्यात हलका पाऊस पडू शकतो. या पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने ही बाब शेतकऱ्यांसाठी चिंताजनक आहे. सरासरीपेक्षा कमी यंदा पाऊस पडला आहे. मात्र येत्या काही दिवसात पावसाची शक्यता आहे.

8 सप्टेंबरपासून 21 सप्टेंबरपर्यंत पावसाची शक्यता
सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात सरासरी पेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. 8 सप्टेंबरपासून 21 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात सरासरी इतका किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस बघायला मिळू शकतो.