खरगटे पाणी फेकले; शिवीगाळ करत महिलेला बेदम मारहाण, तीन जणांवर गुन्हा दाखल

जळगाव : खरगटे पाणी फेकल्याच्या कारणावरून महिलेला शिवीगाळ करत लाकडाने बेदम मारहाण केली. चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे २९ रोजी ही घटना घडली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावात मनीषा राजेंद्र मुंढे (४०) या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मजूरी व शेतीचे काम करून त्या आपला उदरनिर्वाह करतात. शुक्रवार, २९ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजता महिलेने घरासमोरील गटारीत खरगटे लागल्याच्या कारणावरून शेजारी राहणारे लहू पितांबर भदाणे, मनिषा लहू भदाने आणि अंकुश पितांबर भदाणे सर्व रा. वाघळी यांनी महिलेला शिवीगाळ करत लाकडाने बेदम मारहाण केली.

या मारहाणीत त्यांना गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी चौकशीअंती अखेर रविवारी ३१ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ प्रविण सपकाळे हे करीत आहे.