गंगा नदीत ४० प्रवाशांना घेऊन जाणारी नाव उलटली

कानपूर : गंगा नदीत दशक्रिया विधीसाठी आलेल्या ४० जणांना नदीत घेवून जाणारी बोट पलटी झाल्याने सर्वच ४० प्रवाशी पाण्यात बुडाल्याची दुर्देवी दुर्घटना उत्तर प्रदेशच्या बलिया येथे सोमवारी सकाळी घडली. त्यापैकी, काहींना स्थानिकांनी पाण्यातून बाहेर काढले, ज्यांना पोहोचयला येत होते, तेही स्वत;हून बाहेर आल्याने बचावले. त्यानंतर, काहींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, पेफना पोलीस ठाणे परीक्षेत्रातील माल्देपूर घाटाजवळ ही घटना घडली. एका बोटमधून ४० जण प्रवास करत होते, दुर्दैवाने ही नाव उलटल्याने अपघात झाला. त्यामध्ये, ४ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. बोटमधील बुडालेल्या इतर लोकांचा शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे.

येथील गंगा नदीच्या माल्देपूर घाटाजवळ ४० प्रवाशांना घेऊन जाणारी नाव पलटी झाल्याने मोठा गोंधळ उडाला. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. तर प्रशासनाने तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे. अद्याप किती जण बेपत्ता झाले आणि बुडाले याबाबत खात्रीशीर माहिती नाही. मात्र, ४ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.