गोठ्याला आग लागून सहा गुरांचा होळपळुन मृत्यू, 3 ट्रॅक्टरही जळून खाक

मुक्ताईनगर । गुरांच्या गोठ्याला भीषण आग लागून सहा गुरांचा होळपळुन मृत्यू झाला तर तीन ट्रॅक्टरही जाळून खाक झाल्याची घटना मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी येथे घडली. या आगीमुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले असून आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

याबाबत असे की, मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी येथे शेतकरी धनराज प्रजापती यांच्या गुरांच्या गोठ्याला आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत ६ गुरांचा होळपळुन मृत्यू झाला आहे, तर तीन गुरे जखमी देखील झाले आहे. तसेच या आगीत तीन ट्रॅक्टर आणि शेतीसाठी लागणारे अवजारे जळून खाक झाली.

यामध्ये शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून ऐन खरीप पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्याला हा मोठा फटका बसला आहे. मध्यरात्री लागलेल्या या आगीमुळे शेतकरी धनराज प्रजापती यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेले अंतुरली दूर क्षेत्राचे पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली व स्थानिक नागरिकांच्या मदतीने व अग्निशामक दलाच्या मदतीने आग पहाटेपर्यंत आटोक्यात आणली. मात्र प्रशासनाकडून या शेतकऱ्याला काही मदत मिळेल का हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे.