गोमांस खाणार्‍यांसदर्भात आरएसएसचे मोठे विधान; काय म्हणाले दत्तात्रेय होसबळे

नागपूर : काही लोक असे आहेत की ज्यांना नाईलाजास्तव गोमांस खावे लागले आहे. अशा लोकांसाठी आम्ही आमची दारं बंद करू शकत नाही. अशा लोकांना आम्ही धर्मवापसी करून घेऊ शकतो. त्यांच्याकडून ज्या गोष्टी घडल्या आहेत, त्याला त्यांचा नाईलाज होता. त्यामुळे त्यांच्यावर सरसकट टीका करणे योग्य नाही, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांनी व्यक्त केले.

दत्तात्रेय होसाबळे म्हणाले, ज्यांचे पूर्वज हिंदू आहेत, ते हिंदू आहेत. ते आज कोणती पूजा करत आहेत, आता काय करत आहेत, हा आपला विचार नाही. जो स्वतःला हिंदू समजतो तो हिंदू आहे. एक तिसराही आहे, ज्यांना आपण हिंदू म्हणतो पण ते हिंदू नाहीत. देशात सुमारे ६०० हून अधिक जमाती आहेत. आम्ही वेगळे आहोत असे या जमातींचे म्हणणे आहे. त्यांना चिथावणी देण्याचे काम भारतविरोधी शक्तींनी केले आहे.

ज्या लोकांच्याबाबतीत काही नाईलाजास्तव घटना घडल्या तर अशा लोकांसाठी दरवाजे बंद करू शकत नाही. दत्तात्रय होसाबळे म्हणाले की, ज्यांनी बळजबरीने गोमांस खाल्ले आहे, त्यांना आम्ही सोडू शकत नाही. आम्ही त्यांच्यासाठी दरवाजे बंद करू शकत नाही. तरीही आम्ही त्यांना घरी परत आणू शकतो, असेही होसबाळे म्हणाले.