घरातून बाहेर पडताना छत्री घेऊन जा! आज तुमच्या जिल्ह्यातील पावसाची स्थिती जाणून घ्या

मुंबई । मान्सून आता हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात व्यापत असून यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. गेल्या आठवड्याभरापासून जळगावसह राज्यातील विविध जिल्ह्यात पाऊस कोसळत आहे. दरम्यान आज बुधवारी देखील राज्यातील बहुतेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. या भागात 40-50 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, आज सोलापूर, लातूर, धाराशिव, पालघर, नांदेड या जिल्ह्यात तुरळक पावसाच्या सरी पाहायला मिळतील. तसेच या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आज आणि उद्या पावसाचा यलो अलर्ट
आयएमडीच्या अंदाजानुसार, ठाणे, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी या भागात मध्यम ते हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, जळगाव, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, या भागातही पावसाची शक्यता आहे. सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांना आज आणि उद्या पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

विदर्भातही जोरदार पावसाची शक्यता
दरम्यान, हवामान विभागाने विदर्भातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात वादळी वारा आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना पुढील तीन दिवसांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.