जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश; दोन वेगवेगळ्या चकमकीत तीन दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत तीन दहशतवादी ठार झाले. कुपवाडामधील माछिलमध्ये सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. तर तंगधारमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. दरम्यान, राजौरीमध्ये चकमक सुरू आहे. दहशतवाद्यांनी सीमेपलीकडून घुसखोरी केल्याचे बोलले जात आहे. या चकमकीनंतर परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे. शोध मोहीम अजूनही सुरू आहे.

तंगधार भारत आणि पाकिस्तान दरम्यान नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) आहे. हे नेहमीच तणावाचे केंद्र राहिले आहे. दहशतवाद्यांच्या कारवाया रोखण्यासाठी सुरक्षा दलांनी या भागात शोध मोहीम सुरू केली. यावेळी सुरक्षा दलांनी एका परिसराला घेरण्याचा प्रयत्न केला, तेव्हा दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला.

राजौरीमध्ये सर्च ऑपरेशन सुरू
राजौरीमध्येही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. सुरक्षा दलांनी 28 ऑगस्ट रोजी रात्री 9:30 वाजता राजौरीतील खेरी मोहरा लाठी गाव आणि दंथाल परिसरात शोध मोहीम सुरू केली. गुरुवारी रात्री 11.45 वाजता ही शोध मोहीम सुरू झाली. खेरी मोहरा परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे.

दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी ड्रोनचा वापर
चकमकीदरम्यान दहशतवाद्यांची परिस्थिती समजून घेण्यासाठी सुरक्षा दलांनी ड्रोनचा वापर केला. अशा प्रकारे त्यांनी लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली. त्याचबरोबर सुरक्षा दलांच्या इतर तुकड्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. याआधी केंद्रीय गृहमंत्री आणि संरक्षणमंत्र्यांनी जम्मू-काश्मीरच्या सुरक्षेसंदर्भात अनेक विशेष बैठकाही घेतल्या आहेत. यामध्ये अलीकडे वाढलेल्या दहशतवादी कारवायांना आळा घालण्यावर चर्चा करण्यात आली. यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.