जळगावच्या शेतकऱ्यांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, केली ‘ही’ मागणी

जळगाव : राज्याच्या अनेक भागात आजही रस्त्याअभावी नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे. परिणामी गर्भवती महिलासंह रुग्णांना डोलीतून आणण्याची वेळ अनेक नागरिकांवर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील कलाली गावातील शेतकऱ्यांना देखील रस्ता नसल्याने अनेक समस्यांना समोर जावे लागत आहे. त्यामुळे येथील गावकऱ्यांनी सुरवातीला स्थानिक प्रशासनाला पत्र लिहूनही काही झाले नसल्याने आता थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून रस्ता देण्याची मागणी केली आहे. शिवाय मागणी पूर्ण न केल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे.

काय म्हटलं पत्रात?
‘मुख्यमंत्री साहेब, आम्हाला तुमची कर्जमाफी नको, की सबसिडी नको, फक्त आम्हाला आमच्या शेतात जाण्या येण्यासाठी रस्ता द्यावा, अशी मागणी कलाली गावातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा केला जात असताना आमच्या गावात अद्यापही शेत रस्ते होऊ शकले नसल्याने, पावसाळ्याच्या दिवसात आमच्या शेतात जाता येत नाही की, पिकविलेला माल घरी आणता येत नाही, शेतात पिकविलेला माल घरी आणण्यासाठी एक ट्रॅक्टर ओढण्यासाठी त्याला अजून दोन ट्रॅक्टर जोडावे लागत आहेत, त्यामुळे तीन पट खर्च वाढत आहे.

पालकमंत्र्यांनी रस्ता करण्याचे आश्वासन दिले आहे, तर मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी ही एक किमी रस्ता करून दिला असला तरी अजून तीन किमी रस्ता बाकी असल्याने, मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध योजना सरकार राबवित असले तरी शेत रस्तेही तितकेच महत्वाचे आहेत. गावातील शेत रस्ते व्यवस्थित नसले की शेतात माल पिकून सुध्दा शेतकऱ्यांना किती हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. हे कलाली गावात पाहायला मिळतेय.