जळगावात चालत्या प्रवासी रिक्षाने घेतला अचानक पेट, मोठं नुकसान

जळगाव : चालत्या प्रवाशी रिक्षाने अचानक पेट घेतल्याची घटना आज गुरूवारी दुपारच्या सुमारास शहरातील पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाजवळ घडली. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पथकाने ही आग आटोक्यात आणली. तोपर्यंत प्रवाशी रिक्षा जळून खाक झाली आहे. ही आग कोणत्या कारणामुळे लागली याची माहिती समोर आलेली नाही.

जळगाव शहरातील पिंप्राळा येथील रेल्वे उड्डाणपुला जवळून गेलेल्या रस्त्यावर गुरूवार, १२ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जळगावातून पिंप्राळा येथे जात असलेल्या  (एमएच १९ व्ही ३४८८) क्रमांकाच्या रिक्षाने अचानक पेट घेतला. ही बाब रिक्षा चालकाच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने रिक्षा रोडच्या बाजूला घेवून रिक्षा थांबविली. त्यानंतर क्षणातच रिक्षाने मोठा पेट घेतला. यात संपुर्ण रिक्षा जळून खाक झाली आहे. ही आग कोणत्या कारणामुळे लागली यांची माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान काही वेळानंतर महापालिकेचे अग्निशमन विभागाचे पथकातील युसुफ पटेल, भारत बारी, रविंद्र बोरसे आणि तेजस जोशी यांनी बंबासह घटनास्थळी दाखल झाले व आग विझविण्यात आली. याबाबत पोलीसात नोंद घेण्याचे काम सुरू होते.