जळगावात थंडीचा गारठा हरवला; कमाल आणि किमान तापमान वाढ

जळगाव । उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या अभावामुळे राज्यात थंडी कमी झाली आहे. जळगावात सध्या पहाटे आणि रात्री थंडी तर दिवसा उन्हाचे चटके बसत आहे. जिल्ह्यात काही दिवसापूर्वी १० अंशाखाली असलेलं तापमान आता १० अंशावर गेल्याने थंडीचा कडाका कमी झाला आहे. कमाल आणि किमान तापमान वाढ झाली आहे.

हिवाळा ऋतु संपण्यास अद्याप अवकाश आहे. मात्र त्यापूर्वीच जिल्ह्यात थंडीचा जोर काही अंशी ओसरला असून फेब्रुवारीतच उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत असल्याचं चित्र आहे. ३ फेब्रुवारीला जिल्ह्यामधील दिवसाचा कमाल‎ तापमानाचा पारा ३१.४ अंश सेल्सिअसवर गेला. तर रात्रीचा पारा १३.४ अंश सेल्सिअसवर गेला. किमान तापमान वाढल्याने‎ रात्रीच्या थंडीची तीव्रता कमी झाली आहे.‎

फेब्रुवारीत महिन्याचे तापमान जानेवारी प्रमाणेच बऱ्यापैकी थंडी जाणवत असते. मात्र अलीकडे झालेल्या वातावरणातील बदलामुळे फेब्रुवारीतच उन्हाळा अनुभवायला मिळतो का, अशी शक्यता बळावली आहे. दरम्यान, उत्तरेकडील येणाऱ्या थंड वाऱ्यांचा परिणाम राज्यावर दिसून आला. गेल्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यातील रात्रीचे तापमान ९ अंशावर तर दिवसाचे तापमान ३० अंशाखाली होते. यामुळे थंडीचा कडाका जाणवत होता.

असे आहे राज्यातील तापमान
जळगाव ३१.४ (१३.४), पुणे २९.२ (१३.४), धुळे ३०.० (९.९),कोल्हापूर ३०.६ (१७.१), महाबळेश्वर २५.२ (१३.९), मालेगाव २९.८ (१४.६), नाशिक २९.० (१३.०), निफाड २९.५ (९.७), सांगली ३१.९ (१६.१), सातारा ३०.२ (१४.२), सोलापूर ३४.९(१८.०), सांताक्रूझ ३१.६ (१९.४), डहाणू ३०.० (१९.०), रत्नागिरी ३०.७ (१८.७), छत्रपती संभाजीनगर ३०.० (१५.५), नांदेड – (१७.४), परभणी ३१.३ (१५.३), अकोला ३२.८ (१५.३), अमरावती ३१.६ (१७.०), बुलडाणा २८.७ (१५.४), ब्रह्मपुरी ३१.४ (१६.२), चंद्रपूर ३०.२ (१६.४), गडचिरोली २७.२ (१५.०), गोंदिया २९.४ (१३.८), नागपूर ३०.४(१४.४), वर्धा ३०.९(१५.९), वाशीम ३१.८ (१४.६), यवतमाळ ३२.५ (१६.२).