जळगाव : जिल्ह्यातील प्रौढ शिक्षणाला नवी उभारी

तरुण भारत लाईव्ह । २२ सप्टेंबर २०२३। घरातील प्रतिकूल परिस्थितीत शाळेची भीती असो वा शिक्षणात फारशी आवड नसणे असो  त्यात उलटून गेलेले वय यामुळे शिक्षणाची  विस्कटलेली घडी आता पुन्हा एकदा बसण्याची चिन्हे आहेत. मुंबई स्थित टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत शिवाजीनगर येथील महानगरपालिकेच्या मध्यवर्ती शाळा क्रमांक एक येथे प्रौढ शिक्षणासाठी आता रात्र शाळा प्रकल्प सुरू झाला आहे.

यामुळे आता जिल्ह्यातील प्रौढ साक्षरता वर्गाला पुन्हा नवीन उभारी मिळण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या रात्र शाळा उपक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परिरक्षवधीन जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण, महानगरपालिका उपायुक्त अभिजीत बाविस्कर शिक्षणाधिकारी दिपाली पाटील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे विद्यार्थी मुकेश मुनेश्वर आधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले प्रौढसाक्षरतेला चालना देण्यासाठी विशेषतः स्थलांतरित आणि समाजातील दुर्बल घटकांमध्ये शिक्षणाची गंगा आणण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. अर्थव्यवस्थेच्या औपचारिक क्षेत्रात सामील होण्यासाठी शालेय शिक्षणाची पात्रता ही एक महत्त्वाची आवश्यकता आहे. गरिबीतून बाहेर पडण्यास शिक्षण हे महत्त्वाचे भूमिका बजावते असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

मुकेश मुनेश्वर म्हणाले रात्र शाळेचा प्राथमिक उद्दिष्ट पंधरा वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींना शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण प्रदान करणे आहे. ज्यांच्याकडे साक्षरता कौशल्य नाही त्यांना इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण देणे हे ध्येय आहे. या उपक्रमात शिक्षण घेण्यासाठी इच्छुक ४७ जणांची नोंदणी करण्यात आली उपक्रमात स्वेच्छेने सहभागी होऊन शिकवण्याचे काम करण्यासाठी स्वयंसेवक म्हणून काम करण्याची इच्छा असल्यास 95 79 90 280 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.