ज्येष्ठ अभिनेते ‘अरविंद काणे’ काळाच्या पडद्याआड

तरुण भारत लाईव्ह । २३ सप्टेंबर २०२३। मराठी सिनेसृष्टीतून अत्यंत दुःखद घटना समोर येत आहे. ज्येष्ठ अभिनेते अरविंद काणे यांचं वृद्धपकाळाने निधन झाले आहे. अरविंद काणे मराठी रंगभूमीसह टेलिव्हिजनसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांनी नात गौतमी देशपांडेसोबत ‘माझा होशील ना’ या मालिकेमध्ये काम केलं होतं.

अरविंद काणे यांनी १९५३ पासून मराठी रंगभूमीवर काम करण्यासाठी सुरुवात केली. ते मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे यांचे आजोबा होते. त्यांनी ‘एखाद्याचं नशीब’, ‘किमयागार ‘, ‘तो मी नव्हेच’ , ‘नटसम्राट’ यांसारख्या नाटकांचे अनेक प्रयोग केले होते. त्यांची मुलगी म्हणजेच गौतमीची आईदेखील अभिनेत्री होती. त्यांनी आपल्या पत्नी आणि मुलीसोबत काम केलं होतं. तर गौतमीसोबत त्यांनी ‘माझा होशील ना’ मालिकेत छोटीशी भूमिका केली होती. या मालिकेत ते पाहुणे कलाकार म्हणून दिसले होते. नुकतंच त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. आजोबांच्या जाण्याने गौतमी भावुकझाली झाली आहे. तिने त्यांच्यासाठी खास पोस्टही केली आहे.

या पोस्ट मध्ये गौतमीने असे म्हटले कि प्रिय आजोबा, पत्रास कारण की, आज तुमच्या आयुष्याच्या तिसऱ्या अंकाचा पडदा पडला! आज माझ्या आजोबांची, आईच्या मामाचा बाबांची, आज्जीच्या प्रेमळ नवऱ्याची, उत्तम भावाची, आदर्श मुलाची अशा सगळया भूमिका असलेलं तुमच तीन अंकी नाटक इथेच संपलं. पण आजोबा काय सांगू तुम्हाला. इतक्या कमाल वठवल्यात तुम्ही सगळ्या भूमिका! प्रत्येक भूमिकेच वेगळेपण जपलं तुम्ही. कथानक पण काय सुंदर आणि नाट्यमय होतं हो नाटकाचं. सुरूवात झाली ती स्वतःचे वडील जाण्यापासून, नंतर आईचा पुनर्विवाह, नवीन कुटुंबामध्ये प्रवेश, नवीन भावांचं सक्ख्यांपेक्षा जास्त प्रेम, तुमच्यासारख्या हँडसम नायकाला साजेल अशा सुंदर नायिकेचा आयुष्यात प्रवेश. नायकाचं नाटकाविषयाचं प्रेम ….लग्न ….. दोन गोड़ मुलांचा जन्म …. सारंच कथानक एखाद्या फिल्मला लाजवेल असा. तुमचे एक एक प्रवेश पण काय लाजवाब आजोबा. ‘एखाद्याचं नशीब’ म्हणत एक सुंदर नायिका आयुष्यात आली. नकळतपणे मनाचे धागे जुळत गेले . मग ‘याला जीवन ऐसे नाव’ म्हणत तुम्ही पुढे गेलात. ‘अशी पाखरे येती’ म्हणत संसार सुरु झाला.

नाटककराच्या शोधात तुम्ही सहा पात्र’ फिरत गेलात. पुढे ‘शेहेनशाह’ बनून तुम्ही ‘नटसम्राट’ असल्याचा दाखवून दिलंत. दुःखांकडे पाठ फिरवत हसतमुखानं ‘तो मी नव्हेच’ म्हणत राहीलात.’ असे आयुष्याचे खरे खुरे ‘किमयागार’ ठरलात. ‘चाणक्य’ बुद्धीने सतत आरोग्यक्षेत्राला योगदान देत आलात. तीन अंक कुठे कसे संपले कळलंच नाही. प्रेक्षक प्रत्येक नाटकातून काही ना काही घेऊन जातो. यातून काय बरोबर घेऊन जाऊ अन काय नको असा वाटतंय. त्यामुळे हे नाटकच आता सोबत ठेवणारोत आयुष्यभर. तुम्ही आता मात्र शांत व्हा. दमला असाल तुम्ही. आता खऱ्या अर्थानी पडदा पडला आहे. नाटक संपल्यानंतर तो तुमच्यातला नट आता शांत आणि समाधानी आहे.

तुमच्यातला हा ‘नट’ आम्ही आमच्यात आयुष्यभर जागा ठेवू. अन तुमच्या १० टक्के तरी चांगुलपणा आणि सकारात्मकता आमच्यात यावी अशी प्रार्थना करू. तुमच्याच एका प्रवेशातल हे वाक्य, झालेत बहू ,असतील बहू , होतील बहू ,पण या सम हा!! रंगदेवतेला वंदन करून हा तीन अंकी प्रवेशाचा पडदा पडला असं जाहीर करते अन् त्या नटसम्राटास पुन्हा एकदा वंदन करते. तुमची नात आणि तुमची फॅन. गौतमी. ज्येष्ठ अभिनेते अरविंद काणे यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.