ज्येष्ठ अभिनेत्री भैरवी वैद्य यांचे निधन; वयाच्या ६४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

तरुण भारत लाईव्ह । १३ ऑक्टोबर २०२३। बॉलिवूड इंडस्ट्री मधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री भैरवी वैद्य यांचं निधन झालं आहे. वयाच्या ६४व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भैरवी यांच्या ‘हसरतें’ आणि ‘महीसागर’ या शोला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळाली. भैरवी यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून अशी छाप सोडली होती.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, भैरवी वैद्य मागच्या सहा महिन्यांपासून कॅन्सरशी झुंज देत होत्या. उपचारादरम्यान  त्यांची प्राणज्योत मालवली. भैरवी ६४ वर्षांच्या होत्या. त्यांची मुलगा जानकी वैद्यने सोशल मीडियावर पोस्ट लिहित आईच्या निधनाविषयीची माहिती दिली. भैरवी वैद्य यांनी ‘ताल’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. ऐश्वर्या रायच्या या चित्रपटामध्ये भैरवी यांनी जानकीची भूमिका साकारली होती.

भैरवी यांनी गेल्या ४५ वर्षांच्या कारकिर्दीत चित्रपट आणि टीव्हीवर बऱ्याच भूमिका साकारून आपली वेगळी ओळख निर्माण केली. भैरवी वैद्य यांनी ‘चोरी चोरी चुपके चुपके’, ‘ताल’, ‘व्हॉट्स योर राशी’, ‘हमराज’, ‘क्या दिल ने कहा’ या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. भैरवी यांचे चाहते आणि सेलिब्रिटी सोशल मीडियावर पोस्ट करत दु:ख व्यक्त करत आहेत.