ट्रॅक्टर चालवून करायचा मजुरी; आता करणार देशाचे रक्षण

सोयगाव :  घरची परिस्थिती हलाखीची अख्खे कुटुंब भूमिहीन कुटुंबातील सर्वच सदस्य हात मंजुरीवर असलेल्या वेताळवाडीच्या डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या गलवाडा (अ) गावातील १९ वर्षीय तरुणाने अग्निविरच्या भरतीत यश संपादन करून ट्रॅक्टरवर चालक म्हणून मजुरी करणारा तरुण अग्निविरमध्ये यश संपादन करून देशाचा सैनिक झाला. धर्मदास आनंदा गायकवाड (वय १९) असे या तरुणाचे नाव आहे. त्याने सात महिन्याची प्रशिक्षण पूर्ण करून शनिवारी गावात येताच गावाने त्याचे स्वागत करून गावांत मिरवणूक काढली.

सध्या धर्मदास गायकवाडला आसाममध्ये सीमेवर पोस्टिंग झाली आहे. छपाराच्या घरात राहून धर्मदासने अभ्यास करून अग्निविर भरतीमध्ये यश संपादन करून त्यास सात महिन्याची प्रशिक्षण देण्यात आल्यावर त्याने सुटीसाठी गलवाडा गावात आला. यावेळी गावातून ग्रामस्थांनी त्याची मिरवणूक काढून गावभर त्या सैनिकांचे औक्षण करण्यात आले. वयोवृद्ध आजी आजोबाच्या सहवासात राहिलेल्या धर्मदासला आजोबांनी जुन्या तालमीत प्रशिक्षण दिले. आजोबांनी दिलेल्या टिप्सवर त्याने हे यश मिळविले असल्याचे धर्मदासने सांगितले.

दरम्यान आईवडील शेतीच्या मजुरीवर कुटुंबाची उपजीविका भागावीत असताना त्यांना हातभार व्हावा म्हणून धर्मदास हा गावात ट्रॅक्टर चालकाचे काम करीत होता. लहान भाऊ आणि बहिणीच्या शिक्षणाची जबाबदारी डोक्यावर घेवून धर्मदास ने स्वतःचे आयुष्यही बदलून टाकले आहे. गलवाडा गावातील गायकवाड कुटुंब हे मुळातच भूमिहीन होते. त्यामुळे त्या कुटुंबातील सदस्यांना शेतीच्या कामावर जाण्याशिवाय पर्याय नव्हता त्यात पुन्हा धर्मदासला अभ्यासाची चिंता परंतु जीवनात चिकाटी व ध्येय डोळ्यासमोर ठेवत धर्मदासने ट्रॅक्टर चालवून अभ्यास पूर्ण केला. त्यामुळे भूमिहीन कुटुंबातील सदस्य आता देशाच्या सीमेवर पोहचला आहे.