तर शरद पवार देशाचे पंतप्रधान झाले असते…असा आहे १९९६ मधील किस्सा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील अशी चर्चा सातत्याने राजकीय वर्तुळात सातत्याने होत असते. आताही विरोधी पक्षांचा चेहरा म्हणून शरद पवार यांच्या नावाची चर्चा आहे. अशातच काँग्रेसचे नवे कार्यकारी अध्यक्ष, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मोठा दावा केला आहे. एच. डी. देवगौडा यांच्यानंतर आय. के. गुजराल नाही तर शरद पवार देशाचे पंतप्रधान झाले असते, असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हंटलं आहे.

एका खासगी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पटेल म्हणाले की, मला एका गोष्टीची खंत आहे. ही खंत शरद पवारांनाही आहे. १९९६ साली देवगौडा यांचा पाठिंबा काँग्रेसच्यावतीने सीताराम केसरी यांनी काढून घेतला होता. तेव्हा काँग्रेसमध्ये अंतर्गत जे वातावरण होतं, त्यामुळे १०१ टक्के सर्व लोक शरद पवारांच्या पाठिशी उभे होते. त्यावेळी शरद पवार ठाम राहिले असते, तर देवगौडा यांच्यानंतर आय. के. गुजराल नाहीतर शरद पवारच देशाचे पंतप्रधान झाले असते, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

लोकसभा निवडणुकीनंतर ११ महिन्यानंतर केसरी यांनी देवगौडा यांचा पाठिंबा काढून घेतला. त्यावेळी काँग्रेसची परिस्थितीही चांगली नव्हती. १४५ खासदार होते. तर, शरद पवार संसदीय नेते होते. देवगौडा यांचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की, निवडणूक लागण्याची शक्यता होती. तर लोकसभा निवडणुकीच्या ११ महिन्यानंतर कोणत्या खासदाराला लगेच निवडणूक परवडणार होती? अचानक निवडणुकीला सामोरे गेल्यावर खासदार आणि पक्ष निवडून येईल का? याबाबत शंका निर्माण झाली होती.