दहशतवाद्यांचा सामना करताना चोपड्यातील बीएसएफ जवानाला हौतात्म्य

जळगाव । जळगाव जिल्ह्यावासियांसाठी अत्यंत दुःखत बातमी आहे. बांगलादेशाच्या सीमेवर त्रिपुरा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चोपडा येथील बीएसएफ अरुण दिलीप बडगुजर (४२) यांना वीरमरण आले. ही माहिती कुटुंबियांना कळताच आई- वडील, पत्नी, मुलांनी एकच हंबरडा फोडला. यामुळे बडगुजर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अरुण बडगुजर हे गेल्या २० वर्षांपासून १०५ बीएसएफ बटालियन (सी टी /जीडी )मध्ये कार्यरत होते. ते चार महिन्यांनी निवृत्त होणार होते. सोमवारी दुपारच्या सुमारास भारत -बांगलादेश सीमेवर दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत त्यांना वीरमरण आले, अशी माहिती तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी दिली.

अरुण बडगुजर यांचे पार्थिव आगरताळा येथून इंदौर विमानतळावर ११ सप्टेंबर रोजी ०.२५ वाजता पोहोचेल. तेथून बीएसएफच्या वाहनाद्वारे त्यांच्या मूळ गावी पार्थिव पोहोचेल. अरुण बडगुजर यांनी जम्मू, पंजाब, ओडिसा, कोलकाता आणि त्रिपुरा आदी ठिकाणी देशसेवा केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.