दिवाळीपूर्वी सर्वसामान्यांना दिलासा ; खाद्यतेलाच्या किमतीत घसरण

Pouring food oil in hot pan for deep frying.

जळगाव । देशात वाढत्या महागाईचा सर्वसामान्यांवर परिणाम होत असतो. कोरोनाच्या लॉकडाऊन काळात खाद्यतेलाचे दर गगनाला भिडले होते. प्रति किलो तेलाचा दर १७० ते १८० रुपयापर्यंत पोहोचले होते. मात्र यातून आता खाद्यतेलाच्या दरात बरीच घसरण झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, खाद्यतेलाचा दर गेल्या वर्षीपेक्षा स्वस्त झालं आहे.

जळगाव स्थानिक बाजारात गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सोयाबीन तेलाच्या एका पाऊचची किंमत १२० ते १२३ रुपयापर्यंत होते. तर खुले एक किलो तेलाचा दर जवळपास १२६ ते १३० रुपये इतके होते. परंतु सध्या (आजच्या दिवशी) सोयाबीन तेलाच्या एका पाऊचची किंमत ९६ ते ९९ रुपये इतकी आहे. तर खुले एक किलो तेलाचा दर १०५ ते ११० रुपयापर्यंत विकला जात आहे. म्हणजेच वर्षभरात खाद्यतेलाच्या किमतीत जवळपास २५ ते ३० रुपयाची घसरण झालेली दिसून येतेय.

तेलाचे भाव सध्या कमी असून दिवाळीत देखील भाव कमीच राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तेलासाठी लागणारा कच्चा माल मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. आगामी दसरा, दिवाळी सण लक्षात घेता उत्पादनातही वाढ झाली आहे. बाजारात खाद्यतेलाची आवक वाढली आहे. या सर्व बाबी पाहता कंपन्यांनी खाद्यतेलाचे दर कमी केले आहेत.

असे आहेत दर?
सोयाबीन – १०५ ते ११० रुपये प्रति किलो
शेंगदाणा – १८० ते १९० रुपये प्रति किलो
पामतेल – ९१ ते ९६ रुपये प्रति किलो
तीळ – २३५ ते २४० रुपये प्रति किलो
सरसो – १८० रुपये प्रति किलो