दुपारची वेळ, करण शेतात निंदणीसाठी गेला; काहीतरी चावल्यासारखं झालं… जळगावमधील थरारक घटना

जळगाव : जिल्हयातील धरणगाव तालुक्यात सर्पदंश झाल्याने एका मुलाने जीव गमावलाय. या घटनेनं हळहळ व्यक्त केली जातेय. शेतात निंदणीसाठी गेला असता सर्पदंश झाल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. करण राजू बारेला (१३) असे मयत मुलाचे नाव आहे. ३१ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मुलाच्या मृत्यूने बारेला कुटुंबियांना धक्काच बसलाय.

चोपडा तालुक्यातील वैजापूर येथील रहिवाशी राजू बारेला हे त्यांची दोन मुले आणि पत्नी सह धरणगाव तालुक्यातील पाळधी खुर्द गावात वास्तव्याला आहे. शेतमजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. राजू बारेला यांचा लहान मुलगा करण बारेला हा गुरूवार ३१ रोजी गावातील शेतात निंदणीच्या कामासाठी त्याच्या काकू सोबत गेलेला होता. दुपारी शेतात काम करत असताना त्याच्या पायाला सापाने चावा घेतला. तो बेशुध्द पडल्याने शेतात काम करणाऱ्या मजूरांनी तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

त्यांच्यावर उपचार सुरू असताना रात्री ८ वाजता प्राणज्योत मालविली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत करणच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ आणि एक बहिण असा परिवार आहे. पुढील तपास  पोहेकॉ अनिल फेगडे करीत आहे.