दुपारची वेळ, घरातून निघाला तो परतलाच नाही; कुटुंबीयांची अवस्था बिकट

जळगाव : नदी पात्रात पाय घसरून पडल्याने सहावीत शिकणाऱ्या बालकाचा बुडून दुदैवी मृत्यू झाला.  वैभव नरेंद्र पाटील (वय १२) असे मृत झालेल्या बालकाचे नाव आहे. आव्हाण येथे आज बुधवार, १८ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पोलीस सूत्रानुसार, वैभव पाटील हा आपल्या आईवडील व लहान भाऊ यांच्यासह आव्हाण ता. जळगाव येथे वास्तव्याला होता.  वैभव हा सहावीच्या वर्गात शिकत होता. मंगळवार १७ रोजी दुपारी ३ वाजता घरातून निघाला होता. सायंकाळी उशीरापर्यंत वैभव घरी न आल्यामुळे नातेवाईकांनी वैभवचा शोध घेतला. गावात व शेतीशिवारात शोध घेतल्यावर देखील वैभव आढळून आला नाही. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती.

पोलीस ठाण्यात नोंद केल्यानंतर  गावातील काही जणांनी मंगळवारी दुपारच्या वेळेस गिरणा काठावरील महादेव मंदिरात खेळताना पाहिले. याठिकाणी वैभवचे काका धीरज पाटील यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर खेळताना वैभव नदीवर गेला असावा या शंकेने बुधवार, १८ रोजी  दुपारी २ वाजता धीरज पाटील व स्वप्नील जोशी यांच्यासह काही जण नदी पात्रात शोध घेत असताना, २.३० वाजता गिरणेच्या वरच्या भागातील पात्रात वैभवचा मृतदेह तरंगताना आढळून आला.

या घटनेमुळे वैभवच्या मृत्यूने आईवडीलांचा मोठा धक्का बसला. यावेळी मनहेलावणारा आक्रोश केला. पोलीसांनी पंचनामा केल्यानंतर, मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. वैभवच्या पश्चात आईवडील आणि लहान भाऊ असा परिसार आहे. माजी पोलीस पाटील उत्तम पाटील यांचा नातू होत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.