दुर्दैवी ! बैलगाडीच्या चाकात शाल अडकल्याने शेतमजूर महिलेचा मृत्यू; जळगाव तालुक्यातील घटना

जळगाव : शेतात जाणाऱ्या महिलेचा अंगावरील शाल बैलगाडीच्या चाकात अडकल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. जळगाव तालुक्यातील भादली येथे शनिवार,२४ रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

जानुबाई भायला बारेला (वय ३२, रा. गोंट्या पांचाळ, ता. भगवानपुरा जि. खरगोन, मध्यप्रदेश, ह. मु. भादली ता. जळगाव) असे मयत महिलेचे नाव आहे. त्या भादली येथे पती, मुले, दीर, जाऊ यांच्यासह राहते. शेतामध्ये मजुरी काम करून त्या व त्यांचा परिवार हा उदरनिर्वाह करीत होता.

शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास त्या भादलीच्या शेतशिवारात बैलगाडीने त्यांच्या परिवारासह कामाला जात होते. तेव्हा अचानक त्यांच्या अंगावरील शालीचा काही भाग हा बैलगाडीच्या चाकात आला.

बैलगाडीच्या वेगाने त्यांच्या मानेला जोरात गळफास बसल्याने जबर जखम झाली. त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ गाडी थांबवून त्यांना पाणी पाजले. मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.