दुर्दैवी ! बैलाला पाणी पाजत होते शेतकरी, अचानक… घटनेने टिटवी गावात हळहळ

जळगाव : पाणी पाजणाऱ्या शेतकऱ्यास बैलाने शिंग मारल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना टिटवी, ता पारोळा येथे गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजता घडली. प्रकाश तोताराम पाटील (५७) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

पारोळा तालुक्यातील टिटवी येथे प्रकाश तोताराम पाटील हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होते. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. २७ रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास बैलाला पाणी पाजताना त्यांना बैलाने शिंग मारल्याने प्रकाश पाटील यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी पारोळा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत. दरम्यान बैलानेच मालकाचा जीव घेतल्याने टिटवी गावासह तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.