दुर्दैवी! शेतातील काम आटोपून परतत होत्या, वीज पडली अन् संपूर्ण… जळगाव जिल्ह्यातील घटना

जळगाव : जिल्हयात एक दुदैवी घटना घडली आहे. शेतातील काम आटोपून घराकडे जाण्याच्या तयारीत असताना अचानक अंगावर वीज कोसळल्याने दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर एका महिलेला जबर झटका बसल्याने त्या जखमी झाल्या आहेत. या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. मिनाक्षी रविंद्र तळेले ( ३४ ) व अनिता उर्फ ममता विनोद पाटील (३३ ) असे मयत महिलांचे नाव आहे. घटनेबाबत पोलिसांत आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

भुसावळ तालुक्यातील सुसरी येथील शेतमजूर रविंद्र सदाशिव तळेले ( ४० ) हे मिनाक्षी रविंद्र तळेले ( ३४ ) व अनिता उर्फ ममता विनोद पाटील (३३ ) या महिलांसह विल्हाळे शिवारातील शेतात कामांमध्ये गर्क असताना अचानक आज दुवारी दीड ते दोन वाजेच्या दरम्यान विजांच्या गर्जनांसह पावसाला सुरूवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांची धांदल उडाली. सोबत असलेले रविंद्र तळेले हे गुरांचे वैरण चिखलाने घाण होईल त्यामूळे ते शंभर मिटर अंतरावर बैलगाडीत वैरण टाकत होते.

अनिता उर्फ ममता पाटिल व मिनाक्षी तळेले या मजूर महिला पाऊस सुरू असतांना बैलगाडीकडे येत असताना अचानक या महीलांवर वीज कोसळल्याने यात दोन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला. तसेच शेजारील शेतात काम करणार्‍या वत्सलाबाई आनंदा तळेले (वय ५५ ) यांना सुध्दा जबर झटका बसल्याने त्या जखमी झाल्या आहेत. तर, रविंद्र तळेले हे त्या महिलांपासुन काही अंतरावर असल्याने ते सुदैवाने बचावले आहेत.

सदर घटनेची फिर्याद पोलिस पाटिल नितिन पुंडलीक पाटिल यांनी दिल्याने वरणगाव पोलिसांत आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तर परीसरातील शेतकरी व मजूर वर्ग पुर्णतःधास्तावलेला असुन या दुःखद घटनेमुळे सुसरीगाव व मृतक माहिलांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मातेच्या मृत्यूमुळे बालके पोरकी झाली आहेत.
.
या दोन्ही महिलांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, गावात शोककळा पसरली आहे. घटनेची माहीती मिळताच शेतशिवारात गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. सदर घटनेचा वरणगाव पोलीसांना पंचनामा करून दोन्ही मृतदेहांचे वरणगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. तर विजांच्या तांडवामुळे परिसरात प्रचंड भितीचे वातावरण पसरले आहे.