दोन एकरातील हरभरा पिकावर शेतकऱ्याने फिरविला नांगर

धुळे । मागील काही दिवसापासून वातावरणात बदल पाहायला मिळाले. कधी अवकाळी पाऊस तर अधूनमधून ढगाळ वातावरण त्याचबरोबर सकाळी धुके पडत असल्यामुळे या वातावरण बदलाचा फटका हरभरा पिकाला बसल्यामुळे हरभरा पिकाची वाढ खुंटली. सोबतच हरभऱ्यावर रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यातून शिरपूर तालुक्यातील तऱ्हाडी येथे शेतकऱ्याने दोन एकर क्षेत्रात लागवड केलेल्या हरभरा पिकावर नांगर फिरविला आहे. यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे.

सध्या वाढत्या रोगांचा प्रादुर्भावामुळे हरभरा पीक ठेवून देखील त्यातून चांगले उत्पादन येण्याची शक्यता कमीच आहे. या कारणाने शेतकऱ्याने अखेर नाविलाजास्तव आपल्या दोन एकरावरील हरभरा पिकावर नांगर फिरवण्याची वेळ आली आहे.

हवामान बदलाचा फटका बसल्याने शिरपूर तालुक्यातील तऱ्हाडी येथील शेतकऱ्याने आपल्या दोन एकरावरील हरभरा पिकावर नांगर फिरवला आहे. यामध्ये शेतकऱ्याचे जवळपास ३० ते ३५ हजाराहून अधिकचा खर्च वाया गेला असून कृषी विभागाने या संदर्भातील दखल घेऊन मदत मिळवून द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यातर्फे करण्यात आली आहे.