धरणामध्ये मुतण्याचं वक्तव्य करण्यापेक्षा थुंकणं चांगलं; राऊतांचा अजित पवारांना टोला

तरुण भारत लाईव्ह । नाशिक : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे काल खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव घेतल्यानंतर थुंकले होते. राऊतांच्या या कृतीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असतांना राष्ट्रवादीचे नेते तथा विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी संजय राऊतांना बोलतांना संयम राखण्याचा सल्ला दिला दिला होता. मात्र राऊतांनी त्यावरुन अजित पवारांना लक्ष करत ‘धरणामध्ये मुतण्याचं वक्तव्य करण्यापेक्षा थुंकणं चांगलं’ असा टोला राऊतांनी अजित पवारांना लगावला आहे. यामुळे महाविकास आघाडीत अजूनही सर्वकाही आलबेलं नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे.

राऊतांच्या थुंकण्याच्या कृतीवर सर्वत्र टीका होत असतांना संजय राऊत किंवा कुणीही बोलताना संयम राखला पाहिजे, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं होतं. याबाबत संजय राऊत यांना विचारलं असता धरणामध्ये मुतण्याचं वक्तव्य करण्यापेक्षा थुंकणं चांगलं असं जोरदार प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं आहे. तसंच ज्याचं जळतं त्याला कळतं असंही संजय राऊत म्हणाले आहेत. आम्ही भोगतो आहोत. आम्ही सगळं भोगूनही जमिनीवर उभे आहोत. मी माझ्या पक्षाबरोबर ठामपणे उभे आहोत. आमच्या मनात पक्ष बदलण्याचा आणि संकटं येत आहेत म्हणून भाजपासारख्या पक्षाबरोबर सूत जुळवण्याचा आमचा विचार होत नाही, असा चिमटाही त्यांनी अजित पवारांना काढला.

१३० कोटी लोकांना माफी मागावी लागेल. कारण लोक कुठे ना कुठे थुंकत असतात. त्यामुळे कुणी काही म्हटलं तरी माफी मागण्याचा काय प्रश्न येतं? मी राजकीय नेत्यांची नावं घेतल्यावर थुंकलो नाही तर बेईमान्यांची नावं घेतल्यावर थुंकलो हा फरक लक्षात घ्या. ज्यांनी महाराष्ट्राशी, शिवसेनेशी, ठाकरे कुटुंबाशी आणि बाळासाहेब ठाकरेंशी बेईमानी केली त्यांचं नाव समोर आलं त्यानंतर माझी जीभ चावली गेली त्यातून ती कृती झाली. यांना जीवशास्त्र, रसायन शास्त्र, मानसशास्त्र बिघडलं आहे असंही संजय राऊत म्हणाले.

सावरकरांशी तुलना

नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधतांना राऊत म्हणाले की, मी कुणावरही थुंकलो नाही. वीर सावरकरांना एकदा कोर्टात आणलं गेलं. वीर सावरकरांनी पाहिलं की त्यांची माहिती देणारा बेईमान कोपर्‍यात उभा आहे. त्याच्याकडे बघून वीर सावरकर थुंकले होते. त्यामुळे बेईमान्यांवर थुंकणं ही हिंदू संस्कृती, हिंदुत्वाचा एक भाग आहे. मी कुणावरही थुंकलो नाही. पण वीर सावरकरांनीही बेईमान्यांवर थुंकणं ही संस्कृती असल्याचं दाखवून दिलं होतं. इतिहासात त्याची नोंद आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.