नंदुरबारमध्ये मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत; तीन जणांचा मृत्यू

नंदुरबार : गेल्या चार दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पाऊस सुरु आहे. नंदुरबार जिल्ह्यातही पावसाने जोर धरला असून, पुराच्या पाण्यात तीन जण वाहून गेल्याची घटना घडली आहे. तसेच पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

अक्राणी तालुक्यातील माळचा गेंदा येथील बायसिंग बहादुर पावरा (३६ ) पुरात वाहुन मयत झाले आहेत. तर अक्कलकुवा तालुक्यातील गुलींअंबरचे रहिवाशी असलेले संतोष रमेश वसावे पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे.

अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागातील बर्डी येथील शासकीय आश्रम शाळेत रोजंदारी शिक्षक असलेले ईश्वर रामा वसावे (रा. गमन) हे रोयाबारीपाडा येथील दुकानावरून आपल्या घरी परत जाताना रस्त्यातील नदी ओलांडत असताना २५ रोजी साडेपाच वाजेच्या सुमारास वाहून गेले होते. त्यांच्या मृतदेह आज २६ रोजी दहा वाजेच्या दरम्यान आढळून आला.

मोलगी-अक्कलकुवा रस्त्यावर घाट सेक्शनमध्ये ठिकठिकाणी दरडी कोसळून वाहतूकीला अडथळा निर्माण झाला आहे. तसेच पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.