नरेंद्र मोदी म्हणाले, हनुमानजी राक्षसांशी लढले, भाजप…यांच्याशी लढणार

नवी दिल्ली : भाजपच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी मोदी म्हणाले, हनुमान जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देतांना मोदी म्हणाले की, ‘आज भारत बजरंग बली सारख्या महासत्तेची जाणीव करून देत आहे. सागरासारख्या मोठ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारत मजबूत झाला आहे. आमचा पक्ष, आमचे कार्यकर्ते हनुमानजींची मूल्ये आणि शिकवणीतून सतत प्रेरणा घेत आहेत.’ हनुमानजी काहीही करू शकतात, प्रत्येकासाठी करतात. पण, स्वत:साठी काहीही करत नाहीत. यातूनच भारतीय जनता पक्षाला प्रेरणा मिळते.

पुढे बोलतांना मोदी म्हणाले की, ‘जेव्हा लक्ष्मणजींवर संकट आलं, तेव्हा हनुमानजींनी संपूर्ण पर्वत वाहून नेला. याच प्रेरणेतून भाजपनंही जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलाय आणि यापुढंही सुरू ठेवणार आहे. हनुमानजींच्या सामर्थ्याप्रमाणंच आज भारताला आपल्या सामर्थ्याची जाणीव होत आहे.’ भ्रष्टाचार आणि कायदा सुव्यवस्थेशी लढण्यासाठी भाजपला हनुमानापासून प्रेरणा मिळते. जर आपण भगवान हनुमानाच्या संपूर्ण जीवनावर नजर टाकली, तर त्यांच्याकडं ‘कॅन डू’ वृत्ती होती, त्यामुळं त्यांना सर्व प्रकारचं यश मिळण्यास मदत झाली. आमचा पक्ष भारत माता, संविधान आणि राष्ट्रासाठी समर्पित आहे, असंही त्यांनी सांगितलं.

हनुमानजींमध्ये अफाट शक्ती आहे, परंतु ते या शक्तीचा उपयोग तेव्हाच करू शकतात, जेव्हा त्यांचा आत्मविश्वास संपेल. २०१४ पूर्वी भारताचीही अशीच परिस्थिती होती, पण आज भारताला बजरंगबलीजींसारख्या आपल्यात दडलेल्या शक्तींची जाणीव झाली आहे. समुद्रासारख्या मोठ्या आव्हानांवर मात करण्यासाठी आणि त्यांना तोंड देण्यासाठी आज भारत पूर्वीपेक्षा अधिक सक्षम झाला आहे, असंही मोदींनी स्पष्ट केलं.

जेव्हा हनुमानजींना राक्षसांचा सामना करावा लागला, तेव्हा ते तितकेच कठोर झाले. त्याचप्रमाणं भ्रष्टाचाराचा प्रश्न येतो, घराणेशाहीचा प्रश्न येतो, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न येतो तेव्हा भाजपही तितकाच कठोर होत आहे. भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या राजकारणाविरोधात आम्ही जोरदार लढा देऊ, असाही मोदींनी इशारा दिला.