‘पत्नीची बदनामी करू नका’… वडिलांच्या आरोपांमुळे रवींद्र जडेजा नाराज

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा मोठ्या वादात सापडला आहे. जडेजाच्या वडिलांनी एका मुलाखतीत मुलगा आणि सुनेवर गंभीर आरोप केले आहेत. या दोघांमध्ये कोणतीही चर्चा होत नसून ते बऱ्याच दिवसांपासून वेगळे राहत असल्याचा आरोप भारतीय क्रिकेटपटूच्या वडिलांनी केला आहे. एवढेच नाही तर वडिलांनी रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा हिच्यावरही आरोप केले आहेत. आता याप्रकरणी जडेजाने मौन तोडले असून हे आरोप चुकीचे आणि एकतर्फी असल्याचे वक्तव्य केले आहे.

तो ट्विटमध्ये म्हणतो की, ‘मुलाखतीत जे काही सांगितलं जात आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. याला कोणताही अर्थ नाहीये. मी अशा प्रकारच्या गोष्टी मानत नाही. माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे निंदनीय असून मला देखील खूप काही सांगायचं आहे. मात्र योग्य वेळी मी बोलणार आहे.’

रविंद्र जडेजाचे वडील अनिरूद्ध जडेजा यांनी एका स्थानिक वृत्तसंस्थेला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत वडिलांनी ‘माझा आता माझ्या मुलाशी कोणताही संबंध नाही. जेव्हापासून त्याचं लग्न झालं आहे तो पूर्णपणे बदलला आहे. मी त्याला क्रिकेटर केलं नसतं तर बरं झालं असतं, माझा मुलगा माझ्याजवळ तरी असता.’

मिळालेल्या माहितीनुसार रविंद्र जडेजाचे वडील अनिरूद्ध सिंह जडेजा आणि रिवाबा यांच्यात फारसं सख्य नाही. वडिलांनी सांगितले की रविंद्र आणि सून रिवाबासोबत त्यांचे बोलणे होत नाही. ते आम्हाला बोलवत नाहीत आणि आम्ही त्यांना बोलवत नाही. आमच्यात कोणतंही नातं नाही. पाच वर्षे झाली अनिरूद्ध सिंह यांनी आपल्या नातवाचं तोंड पाहिलेलं नाही.’